- कोकण-खेड युवाशक्तीचे वल्लभनगर आगार प्रमुखांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) :- कोकणात अनेक उत्सव हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. या उत्सवांपैकी कोकणी माणुस खास आवर्जून आपल्या कोकणात जातो तो उत्सव म्हणजे गौरी-गणपती उत्सव होय. आपल्या गावी जाण्यासाठी सर्व बस आगारामध्ये गर्दीच गर्दी असते. बससेवा कमी आणि प्रवासी संख्या जास्त असते. म्हणून कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवनिमित्त ज्यादा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी आज शनिवारी (दि १२) रोजी वल्लभनगर, संत तुकाराम नगर, पिंपरी (एस. टी. डेपो) आगार प्रमुख संजय वाळवे यांना निवेदन देण्यात आले.
तसेच वल्लभनगरमधून रोज रात्री ११ वाजता सुटणारी गाडी पिंपरी चिंचवड-चोरवणे या बसच्या एकूण दुरावस्थेविषयीही निवेदन देण्यात आले. यासंबंधी वाळवे व संबंधित खेड आगार प्रमुख यांची फोनवरुन चर्चा झाली. लवकरच नवीन बस देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रुपेश मोरे, संदिप जाधव, सुरज उतेकर, संदिप साळुंखे, कैलास मोरे, अंकुर चव्हाण, अनिल कोकिरकर, महेश गोरे, रोहित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.