न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे.
यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.
मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना २०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. उज्जवला योजनेत आधीच अनुदान म्हणून २०० रुपयांचा लाभ दिला जातो. अशा प्रकारे आता त्यांना ४०० रुपये सबसिडी दिली जाईल.












