न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रवाताच्या स्थितीसोबतच अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांमुळे राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, रविवारनंतर पाऊस कमी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
चक्रवाताची स्थिती तेलंगण, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रावर दिसत आहे. त्यामुळे मध्य भारतावर ढगांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच अरबी समुद्रावरून येणारे पश्चिम वारे सशक्त झाल्याने राज्यात आर्द्रता वाहून आणली जात आहे. दुसरीकडे राज्यावर १० अंशांच्या स्थितीत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘या स्थितीमुळे राज्यात सर्वदूर मॉन्सून सक्रिय झाल्याने रविवारपर्यंत (दि. १०) बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवसांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण व गोव्यात पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रातही ढगांची गर्दी झाली असून घाट परिसरात विशेषतः नाशिक, सातारा व पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागात गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस पाऊस कायम राहील. मराठवाड्यात पुढील ४८ तासांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातदेखील पुढील ४८ तासांत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत बन्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.’
पुणे शहरात रविवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे परिसरातील घाटमाथ्यात मुसळधार पावसाची शक्यता असून ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात शनिवारनंतर पाऊस कमी होईल. शहरात पुढील चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहील.