न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवडसह मावळात तासभर जोरदार धुवाधारपणे बरसून पावसाने परतीच्या वाटेकडे कूच केली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.
यंदा देशात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण करत मान्सूनने आजपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. देशात दरवर्षी सरासरी १७ सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मात्र , यंदा त्यास आठ दिवसांचा उशीर झाला.
मान्सूनने आज राजस्थानच्या नैऋत्य भागातून काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास हा भारतीय उपखंडातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे प्रतीक आहे. परतीच्या प्रवासाला विलंब झाल्यास देशात अधिक दिवस पावसाचे राहतात. सलग १३ वर्षे मान्सून उशिरा परतीचा प्रवास सुरू करत आहे. त्याचा थेट परिणाम कृषीक्षेत्रावर होतो. खरिपातील पीक कापणीवेळी पाऊस आल्यास शेतीमालाचे मोठे नुकसान होण्याचीही भीती असते.