- यंदा सोयाबीन उत्पादनाला चांगला भाव मिळलं? शेतकऱ्यांकडून विचारणा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- यंदा पावसासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे यंदा सोयाबीन पेरणीला उशिराच सुरुवात झाली. मात्र, जुलैनंतर आलेल्या दमदार पावसामुळे सोयाबीनचे पीक जवळपास सर्वच भागात बहरून त्याला मोठ्या शेंगाही लागल्या आहेत. तसेच पीक काढणीला आले आहे. या वर्षी सोयाबीनला भावही भक्कम मिळण्याची शक्यता असल्याने, खरीप हंगामातील या पिकाला यंदा भरघोस उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ख्याती वाढत चालली आहे. त्यानुसार सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची दरवर्षी पेरणी सुद्धा होते. परंतु, कीड, रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दुष्काळ, अतिवृष्टीचा फटका बसत असल्याने गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या उत्पादनात घट होत गेली आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असताना देखील सोयाबीन उत्पादकांनी पीक पेरणीमध्ये बदल केला नाही.
यावर्षी मावळ तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड १०० हेक्टरपर्यंत वाढली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टचा पंधरवडा मोठ्या पावसाने झाल्याने काही भागात पाणी तुंबल्याने पिकाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर पोषक हवामान राहिल्याने बहुतांश भागात तग धरून राहिलेले सोयाबीनचे पीक चांगले बहरले असल्याने पिकाला शेंगाही लागल्या. त्यामुळे यावर्षी तरी भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या उत्पादनालाही चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली.
‘‘खरीप हंगामातील सोन्याचे पीक म्हणून सोयाबीन पिकाला ओळखले जाते. सोयाबीन पीक जोमदार आलेले आहे. परंतु, बदलत्या हवामानामुळे मध्येच गायब होणारा पाऊस, कडक तापमान यामुळे सोयाबीन पिकावर कीड रोग येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांकडे लक्ष देऊन आवश्यक ते एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.’’
– अश्विनी खंडागळे, कृषी सहायक़…