- खोटी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यास नगरसेवक अपात्र ठरेल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२३) :- महापालिका व नगरपरिषदा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी अर्जासह प्रतिज्ञापत्रात त्याने किंवा जोडीदाराने, त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीने बेकायदा बांधकाम केले आहे की नाही, हे नमूद करणे यापुढे बंधनकारक असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली.
उमेदवार व त्याच्यावर अवलंबून असलेल्यांनी बेकायदा बांधकाम केल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरतो, तशी कायद्यात तरतूद आहे; परंतु तसे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्याची तरतूद याआधी नव्हती. अशा तरतुदीची मागणी करणारी जनहित याचिका शंतनू नांदगुडे यांनी अॅड. वृषाली कबरे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली.
नांदगुडे यांच्या याचिकेवर राज्य निवडणूक आयोगाने मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, पालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला ही माहिती द्यावी लागेल. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर न्यायालयाने ही तरतूद ग्रामपंचायत व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू करणार का? असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारत २१ डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी तहकूब केली.
उमेदवाराने बेकायदा बांधकाम उभारूनही खोटी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यास नगरसेवक म्हणून अपात्र ठरेल, अशी स्पष्ट तरतूद प्रतिज्ञापत्रात केली आहे. अशा बांधकामास नगरसेवक जबाबदार असतात, याची जाणीव असल्याने अपात्रतेबाबत तरतूद केली आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला बेकायदेशीर बांधकामामुळे अपात्र ठरविण्याची कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरतानाच अशा उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून रोखले जाऊ शकते.