- लागोपाठच्या अपघातांमुळे वाहनचालक गमवातयेत आपला जीव..
- प्रशासन बघ्याच्या भूमिकेत; रस्ता रुंदीकरणाची वाढलीयं मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२३) :- खड्ड्यांमुळे चाळण झालेला आणि नित्याच्या वाहतूक कोंडीत अडकलेला तळेगाव-चाकण रस्ता मोकळा श्वास कधी घेणार?, अशी विचारणा प्रवासी आणि स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यातच वाढत्या अपघातामुळे हा रस्ता मृत्युचा सापळा बनत चालला आहे. पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसीस जोडणाऱ्या तळेगाव – चाकण – शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या धोकादायक रहदारीच्या मार्गामुळे अपघात वाढले आहेत.
दरम्यान शनिवारी (दि. ४) रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास चाकण तळेगाव मार्गावरील सुदुंबरे-सुदवडी येथील सुधा नदी पुलाजवळ कंन्टेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात किवळेतील ३३ वर्षीय दुचाकीस्वाराला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ५) रोजी सुदुंबरे-सुदवडी हद्दीतच चाकण तळेगाव मार्गावर कार आणि ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यातच मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांची रस्त्यावर रीघ लागली होती.
या धोकादायक रस्त्याने हजारो चाकरमानी आपला जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करीत आहेत. शिवाय येथील ब्रिटीशकालीन सुधा नदीवरील दगडी पूल आणि महाळुंगे येथील दगडी पुल धोकादायक अवस्थेत आहेत. त्याचेही स्ट्रकचरल ऑडीट व्हायला हवे, अशी जुनी मागणीदेखील प्रवाशांची आहे. या नित्याच्या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित अस्तित्वातील रस्त्याचे सर्वेक्षण करून रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करावे. एमआयडीसी कामगार आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांसह पिंपरी, चिंचवड आणि मावळ तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
तळेगाव-चाकण महामार्गासाठी पर्यायी बाह्यवळण होणं गरजेच आहे. त्यामुळे मोठी वाहनं त्यामार्गे जातील. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे समक्ष भेटून रस्त्याबाबत मागणी केली होती. त्यांनी सहा महिन्यात रस्त्यासाठी टेंडर काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. याच रस्त्यासाठी शेतकरी स्वतः जागा द्यायला तयार आहे. २०१७ साली आम्ही एमआयडीसीला रस्त्यासाठी आमच्या जागा द्यायला तयार झालो होतो. मात्र अद्यापही शासन जागे होतं नाही. त्यामुळे चाकण-तळेगाव महामार्गाचे भिजत घोंगडे अडले आहे. – मा. रामदास काकडे (स्थानिक शेतकरी)…