- सांडपाणी व्यवस्थापनाअभावी इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- दिवसेंदिवस देहूतील गृहप्रकल्प वाढत आहेत. मात्र, सांडपाणी व्यवस्थापन योग्य नसल्याने पाणी प्रदूषण वाढत आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
देहूत राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यामुळे लोकसंख्या ५० हजार पेक्षा जास्त आहे. मात्र, त्या प्रमाणात पाणी, आरोग्य, वाहतूक समस्या निर्माण होऊ लागली आहे. विकास आराखडा तयार होत असताना सांडपाणी आणि मैलापाणी व्यवस्थापन करण्यात आले. त्यासाठी १३ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना तयार करण्यात आली. मात्र, या योजनेतील तांत्रिक बाबींमुळे योजना धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी चेंबर फुटलेले असून मैलापाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे दररोज पाणी प्रदूषण होत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी शेतात येत आहे.
देहु नगरपंचायतच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे म्हणाल्या, ‘‘कुठे चेंबर फुटलेले आहेत, याची माहिती घेऊन कार्यवाही करू.’’
बांधकाम समितीचे सभापती योगेश काळोखे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमिगत गटारे दुरुस्ती आणि इतर कामासाठी डीपीआर प्लॅन पाठविला आहे. त्यात चेंबर दुरुस्तीसाठी साडे सहा कोटी रुपये खर्च होणार आहे.
भाविक मधुसूदन म्हणाले, इंद्रायणी नदीत पाण्याला वास येत आहे. नदीचे पावित्र्य जपले पाहिजे. देहू कापूर ओढा येथे चेंबर फुटलेले असून सांडपाणी नदीत मिसळत आहे.