न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२३) :- राज्य शासनाच्या विभागांतील विविध संवर्गातील मिळून ८४२ पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबवली जाणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील पाच, गृह विभागातील १०, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एक, सामान्य प्रशासन विभागातील एक, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ५७, पाणी पुरवठा विभागातील तीन, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील ७६५ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या पदांमध्ये गट ‘अ’, गट ‘ब’मधील पदांचा समावेश आहे. पदभरतीच्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम या बाबतची माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १ जानेवारी २०२४ असल्याचे एमपीएससीने नमूद केले आहे.












