- सदनिका १० वर्षांनी नव्हे तर आता इतक्या वर्षांनी विकता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२३) :- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) बांधल्या जाणाऱ्या घरांच्या विक्रीसाठीची अट शिथिल करण्यात आली आहे. मिळालेली सदनिका १० वर्षांनी नव्हे तर पाच वर्षांनी विकता येणार आहे. याविषयीचे विधेयक बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्याचा लाभ राज्यभरातील सदनिकाधारकांना होणार आहे.
एसआरए योजनेतील सदनिका १० वर्षांपर्यंत विकण्यास मनाई होती. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील कलम ३ (ई) नुसार ही बंदी घालण्यात आली होती. ती उठवली जावी यासाठी निर्णय घेण्यासंदर्भात अनेक झोपडीधारक, संघटना, लोकप्रतिनिधी, आमदारांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता.
महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून बदल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मंत्रिमंडळाच्या निर्णयात १० वर्षांचा कालावधी कमी करून तो सात वर्षांपर्यंत आणण्यास मंजुरी दिली होती. मागील अधिवेशनात विधेयकही आणण्यात आले होते. मात्र. ते विधेयक मंजूर करण्यात आले नसल्याने १० वर्षाची अट तशीच कायम राहिली होती.