न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल) :- लोकसभा निवडणूक सन २०१९ चा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर झाल्यानंतर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही किंमतीवर भारतीय जनता पक्षाला पाठींबा देणार नाही, असा खात्रीशीर ठोस विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला द्या, असे पत्र सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”मी मारुती साहेबराव भापकर मोहननगर, चिंचवड पुणे १९ नम्र निवेदन करतो की, गेली ३० वर्ष सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करत असून, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अपक्ष नगरसेवक म्हणून काम केले आहे. सन २००९, सन २०१४ मावळ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढलो आहे. मात्र सन २०१९ ची होऊ घातलेली यावेळीची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सन २०१४ लोकसभा निवडणूकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपा पक्षांनी अनेक आश्वासने दिली. त्यामध्ये विदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या बँक अकाँऊट मध्ये १५ ते २० लाख रुपये पडतील, शेतक-यांच्या शेतमालाला एकुण उत्पादित खर्च अधिक ५० टक्के नफा देऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्विकारु, बेरोजगार तरुणासाठी वर्षाला २ कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ, विदेशी गुंतवणुक वाढवून उद्योगांना चालना देऊ. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनआवश्यक चिज वस्तूंचे भाव स्थिर ठेऊन महागाईवर नियंत्रण ठेवू. अशी आश्वासने ४०० पेक्षा अधिक सभांमधून मोदींनी जनतेला दिली. ही सर्व आश्वासने एकएक करुण खोटी ठरत. त्या सर्व केवळ बाता होत्या हे ५ वर्षानंतर स्पष्ट झाले आहे.
साहेब, या महाठग मोदींनी शेतकरी संपवला, व्यापारी संपवला, बेरोजगारी वाढवली, लघुउद्योग खलास केला, अर्थव्यवस्था मोडकळीस आणली, बँकांचा एनपीए वाढवला,सीबीआय, आरबीआय, निवडणूक आयोग व न्यायपालिकेच्या स्वायत्तेवर घाला घातला जातोय, याच्या धोरणामुळे गरीब आणखी गरीब होतोय व श्रीमंतांना अती श्रीमंत होतोय, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेल स्वस्त असताना, हा प्रचंड टॅक्स लावून जनतेला लुटतोय,देशातील, पक्षातील, कुणालाही विचारात घेत नाही हा घमेंडखोर आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना हा परदेशातील देशांना मदत करतोय, दुष्काळी भागात, आत्महत्याग्रस्थांना कधीच भेटला नाही, समस्या जाणून घेतल्या नाहीत, शेतमाल फेकून द्यायची वेळ आली तरी, पाकिस्तान कडून साखर, कांदा आयात करतोय,इथल्या तुरीला ६० रू बाजारभाव देतोय व इराणची तुर १०० रू ने आयात करतोय, तेलबिया, डाळी तर आयात करतोच व इथल्या मालाची निर्यात मात्र विविध शुल्क लावून अप्रत्यक्ष रोखून धरतोय, देशद्रोही पीडीपी बरोबर मिटक्या मारत युती करतो,जिल्हा बँकेचे म्हणजेच शेतकऱ्यांचे पैसे नोटबंदीत बदलून देत नाही, मात्र शहाच्या जिल्हा बँकेत १३०० कोटी ४ दिवसात बदलून देतो, देशातील जनतेपासून राफेलची किंमत लपवून ठेवतो, ५६० कोटीची वस्तु १६०० कोटीला घेतो. कंपन्याकडून पक्षासाठी करोडोंच्या देणग्या घेतो व त्याच कंपन्यांना फायदा करून देतो. देणगीदारांची नावे गुप्त ठेवण्यासाठीचा कायदा करतोय, पक्षासाठी अज्ञात स्त्रोताकडून करोडोंची देणगी घेतोय (म्हणजे काळा पैसा) स्वीकारतोय, देणगीदारांची नावे देशातील जनतेपासून लपवायची गरज काय ? भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसाच पक्षनिधीत आणतोय. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी करोडोंची जाहिराती करून टॅक्सपेअरचा पैसा बरबाद करतो, लाखोंचे कोट घालून फकिर बनतो १०० दिवसात काळा पैसा आणायच्या बाता मारतो! काळा पैसा दमडीचा आणलाच नाही.विविध राज्यात इतर पक्षातील आमदारांना प्रलोभने दाखवून फोडतो व परत तत्वज्ञान सांगतो. असा हा महाठग निघाला आहे.
तसेच साहेब, सन २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेशी युती तोडून स्वतंत्र निवडणुक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, यांची अफजलखान, औरंगजेबाशी तुलना करुन दिल्लीश्वरांचे आक्रमण म्हणून बेचारा बनून मते मागितली. त्यावेळी उध्दव ठाकरे एकटे पडतात अशी सहानुभूती तयार होऊन सेनेचे स्वबळावर ६३ आमदार निवडुण आले. त्यानंतर मागील चार वर्षात स्वबळाचा नारा देत, युतीत २५ वर्षे सडलोय, आता मुका घेतला तरी युती नाही. हर हिंदू की यही पुकार पहीले मंदिर फिर सरकार ही घोषणा अयोध्येत जाऊन उध्दव ठाकरेंनी दिली. तर पंढरपुरात चौकीदार चोर आहे. अशी घोषणा केली. तर भाजपाने शिवसेनेची औकात काढत पटक देंगे, म्हणत मातोश्रीच्या माफियागीरीचा उल्लेख करीत मातोश्रीच्या भ्रष्टाचारा कोठाळा काढण्याची भाषा केली. या सगळ्या भूमिका वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस नागपुरकर सह उध्दव ठाकरे मुंबईकर बहूरंगी बहुढंगी लोकनाट्य तमाशाने महाराष्ट्राच्या जनतेचे खुप मनोरंजन झाले. चौकीदार “चोर” म्हणनारे, चौकीदार “थोर” म्हणत मोदी मोदी मोदी असा आक्रोश करीत आहेत. त्यामुळे हे हुकूमशाही ठगसेनांचे सरकार सत्ता सिंहासनावरुण पायउतार व्हावे ही आमची मनापासून इच्छा आहे. तसा प्रयन्त आम्ही मागील २ वर्षापासून करीत आहोत.
साहेब,सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर आपण भाजपाने पाठिंबा मागितलेला नसतांना आपण जाहीर केलात. तो राजकीय डावपेजाचा असू शकतो. मात्र त्यामुळे आपल्या व आपल्या पक्षाबाबत ४ वर्ष लोकांमध्ये संभ्रम राहीला. आपण माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असे जाहीर केले. त्यानंतर आपण लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस व भाजपाला शरद पवारांना राजकीय हवेचा अंदाज येतो. त्यामुळेच त्यांनी माघार घेतली. असे बोलण्याची संधी मिळाली. त्यानंतर सन २०१४ प्रमाणे भाजपाला जागा मिळणार नाही. मात्र सिंगल लार्जेस पार्टी भाजपाच असेल, असे वक्तव्य केले. हा देखील राजकीय डावपेजाचा भाग असू शकतो. मात्र त्यामुळे ही लोकांमध्ये संभ्रम आहे.
साहेब, भाजपा – सेना महायुतीचा पराभव झालाच पाहिजे. त्यामुळे “मोदी हटाव देश बचाव” या घोषणे सह आम्ही २ वर्ष काम करत आहोत. आपण व आपला पक्ष सत्तेत असताना आपल्याला व आपल्या पक्षाच्या विरोधात गेली १५ वर्ष आम्ही विरोधात भूमिका घेत आलो आहे. आज ही आपल्या काही मुद्दांबाबत आमचे तीव्र मतभेद आहे. मात्र आज भाजप – सेना महायुतीच्या उमेदवाराला पाडू शकणारा उमेदवारालाच मतदान करावे. असा प्रचार आणि प्रसार आम्ही मावळ लोकसभा, शिरुळ लोकसभा, बारामती लोकसभा, पुणे लोकसभा, दक्षिण लोकसभा मतदार संघात करत आहोत. या पाचही मतदार संघामध्ये भाजप – सेना उमेदवारांना आपल्या पक्षाचे उमेदवार कडवी लढत देत आहेत. आपण या वयात अत्यंत प्रतीकुल परिस्थित महाराष्ट्र ढवळून काढत आहात. त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्या या संघर्षाला मनापासून सेल्यूट.
साहेब, २९ एप्रिल रोजी आपल्याकडील शेवटच्या चौथ्या टप्याचे मतदान होणार आहे. तर २३ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रीय स्थरावर भाजपाला संपूर्ण बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. उलट भाजपाच्या मागच्या वेळेपेक्षा खुप सीट घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आपल्या पक्षाला यावेळी चांगले नंबर मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थित कमी पडणा-या जागांसाठी आपण भाजपाला कुठल्याही किमतीवर पांठिबा देणार नाही. याची आम्हाला खात्री आहे. मात्र काही विशिष्ट परिस्थित दूरदैवाने आपल्या पक्षाचा भाजपाला आतून अथवा बाहेरुन पाठिंबा दिला गेला तर आम्हाला तोंड झोडून घेण्याची वेळ येईल. अर्थात तशी वेळ आपण येऊ देणार नाही. याची खात्री वाटते. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या मुद्दयाबाबत मोठा संभ्रम आहे. तो संभ्रम संपूर्ण दूर करण्याकरिता आपण प्रयत्न करावा. ही नम्र विनंती. लहान तोंडी मोठा घास घेतला त्याबद्दल क्षमस्व, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.