न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांतील दावेदारांची संख्या वाढत आहे. सर्वच प्रमुख पक्षांतील दावेदारांनी तयारी सुरू केली आहे. निवडणूक येत्या मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारीचा दावा करत इतर पक्षांकडेही चाचपणी सुरू केली आहे.
मावळ मतदार संघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगडमधील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीकडून आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला असून चिन्ह कोणते असणार याबाबत साशंकता आहे. ठाकरे गटानेही चाचपणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे संजोग वाघेरे यांनीही ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मावळ मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाची ताकद आहे. रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी, मावळचे आमदार त्यांच्यासोबत आहेत. चिंचवड, पनवलेला भाजपचे, कर्जतमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे, तर उरणला अपक्ष आमदार आहेत. मावळात ताकद व तीन निवडणुकांचा अनुभव असतानाही अजित पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांत लढत झाली. तिन्ही वेळी शिवसेनेने बाजी मारली.
शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत आहेत. हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील शरद पवार गट एकत्र लढणार आहेत. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला, तर महायुतीतील शिंदे गटाला मिळण्याची चिन्हे आहेत. विधानसभेला मावळ, पिपरी मतदारसंघ अजित पवार गटाला तर चिंचवड आणि भोसरी भाजपला राहील, असे सूत्र महायुतीने ठरवल्याचे सांगण्यात येते.
दुसऱ्या बाजूला मावळात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी एकनाथ शिंदेंची वाट धरल्याने संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळणार असून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळाची जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारणेंना पराभवाचा पाणी पाजण्याची ठाकरेंनीही तयारी केली आहे. याचाच प्रत्यय म्हणून संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या वाटेवर चाललले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळातून श्रीरंग बारणे यांच्या विरोधात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हरले. त्यामुळे मावळात पुन्हा अजित पवार गटाला संधी मिळण्याची शक्यता थोडी कमीच आहे. यातच आता संजोग वाघेरे यांच्यामुळे संदीप वाघेरे यांची निवडणुक लढविण्याची इच्छाही आता कमी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मावळात आता श्रीरंग बारणे विरूद्ध संजोग वाघेरे असाच सामाना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.