न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- अवयव दान करण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून सामान्य नागरिकांचे अवयव दानासंबंधी प्रबोधन करत त्यांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या रोटरी क्लबचे कॅलेंडर देखील लोकांचे प्रबोधन करेल, असे मत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या २०२४ वार्षिक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांच्या हस्ते मोरवाडी, पिंपरी येथील हॉटेल घरोंदा हॉटेल येथे पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी, झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डीनेशन कमिटीच्या समन्वयक आरती गोखले, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष यतीश भट, सचिव सचिन वादबुधे, प्रकल्पाचे समन्वयक जसविंदर सिंग सोखी, राजेश अगरवाल, वसंत ग्रुपचे पारेख यांच्यासह रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि आकुर्डी शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि आकुर्डी यांच्या 2024 सालच्या वार्षिक दिनदर्शिकेची “अवयव दान जनजागृती” ही थीम आहे.
उपआयुक्त बांगर म्हणाले, माणसाच्या शरीरातील कोणते अवयव दान केले जातात याबाबत सामान्य माणसाला माहिती नसते, त्याला मी देखील अपवाद नाही. डॉक्टर्स सोडले तर इतर कोणत्याही क्षेत्रातील लोकांना मानवी शरीरातील अवयव दान करण्याबाबत पुरेशी माहिती नसते. रोटरी क्लबच्या माध्यमातून ही अवयव दानाची चळवळ तळागळात पोहचावी. त्यामुळे देशातील गरजवंतांना त्याचा लाभ होईल. मी स्वतः देखील याबाबत कृतीशील जनजागृती करेन, असे ते म्हणाले.
अवयव एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी पोलिस प्रशासन ग्रीन कॉरीडोरच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावत असते. कमीतकमी वेळात अवयव निश्चित स्थळी पोहचविण्यास मदत करते. यामध्ये नागरिक देखील सहकार्य करतात, रुग्णवाहिकेचा आवाज आल्यास लोक तातडीने त्या वाहनास वाट करून देतात, त्याबाबत नागरिकांमध्ये संवेदनशीलता अधिक आहे, असेही बांगर म्हणाले. पुढील वर्षात रोटरी क्लबने ट्रॅफिक नियम, वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणारी दिनदर्शिका काढावी, असे आवाहन त्यांनी रोटरी क्लबला केले.
आरती गोखले म्हणाल्या, आपल्या भरतची लोकसंख्या १३० कोटीच्या वर आहे, मात्र वर्षभरात अवयव दान करणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या आत आहे. त्यामुळे आपल्याला अवयव दान करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजगृती करणे आवश्यक आहे. दान करण्यात आलेले अवयव तातडीने गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. ग्रीन कॉरीडोरमुळे अवयव वेळेत पोहोचण्यासाठी मदत होते.
राजेश अग्रवाल म्हणाले, माणूस मृत पावला की, लोक त्याच्या शरीरावरील दागिने न विसरता काढतात, पण त्यांच्या शरीरात असलेले अमुल्य अवयव जाळून टाकतात. हे असे न करता एखाद्या गरजवंत व्यक्तीला ते दान केल्यास त्याचे जीवन सुकर होईल आणि त्यामुळे आपल्याला समाधान मिळेल.
यावेळी सुनील देशपांडे यांनी मंगेश पाडगावकर यांच्या स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘आपण म्हणजे काय असतो, थोडा धूर, थोडी राख, थोडी माती सुपडा साफ’ या कवितेच्या माध्यमातून अवयव दानाचे महत्व सांगितले.
प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन राजेश अगरवाल यांनी केले तर आभार सुखविंदर सिंग सोखी यांनी मानले











