न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(तळेगाव दाभाडे प्रतिनिधी) (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- जागतिक वारसास्थळांच्या नामांकनासाठी महाराष्ट्रातील १२ शिवकालीन गडकिल्ल्यांची निवड झाली असुन, त्यात मावळ तालुक्यातील महत्त्वाचा म्हणजे लोहगड किल्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लोहगडाला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त १२ शिवकालीन गडकिल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला पाठवला आहे. जागतिक वारसा स्थळांच्यायादीसाठी भारतातर्फे २०२४-२५ साठी सादर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले ९ गिरीदुर्ग व ३ जलदुर्ग अशा १२ गडकोटांना नामांकन देण्यात आले. यामध्ये शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह रायगड, राजगड, साल्हेर, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, तामिळनाडुतील जिंजी आणि मावळ तालुक्यातील लोहगडाचा समावेश करण्यात आला. यामुळे किल्ला व परिसराचा कायापालट होऊन जगभरातुन पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतील.
नवीन प्रकल्प राबवुन त्यातुन स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. लोहगड विकास मंचाने पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लोहगडाचा कायापालट घडवुन आणला. लोहगड विसापुरचा विकास हेच मंचाचे प्रमुख ध्येय असल्याचे मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले.
नामांकनासाठी लोहगडाचा समावेश केल्याबद्दल मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौफ्लडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, गणेश उंडे, बसाप्पा भंडारी, अमोल गोरे आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला.