- देहूचे झपाट्याने नागरीकरण वाढल्याने वाहिन्यांवर ताण..
- देहू नगरपंचायतीला निधीची प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- देहू नगरपंचायत हद्दीतील वाढत्या लोकवस्तीमुळे नव्याने विकसित झालेल्या परिसरात अंतर्गत मल:निस्सारण पाइपलाइन टाकणे, नादुरुस्त पाइपलाइनची दुरुस्ती व मलशुद्धिकरण केंद्रातील पंपाची क्षमता वाढविणे, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मैलामिश्रित सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली. हे काम सुरू झाल्यानंतर जलप्रदूषण कमी होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
देहूमध्ये ग्रामपंचायत असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च करून भूमिगत मल:निस्सारण वाहिन्यांचे काम केले होते. मात्र, त्यानंतर देहूचे झपाट्याने नागरीकरण वाढल्याने या वाहिन्यांवर ताण निर्माण झाला. त्यामुळे वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.
वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहती व गृहप्रकल्पांना भूमिगत मलनिस्सारण पाइपलाइन नसल्याने तेथील दूषित व मैलामिश्रित सांडपाणी ओढ्यांनी सोडले जात आहे. हे ओढ्यांतील दूषित पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. त्यामध्ये नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. या दूषित पाण्यामुळे जलचरांनाही धोका निर्माण झाला आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी येणारे भाविक इंद्रायणी नदीवर अंघोळ करतात, यामुळे इंदायणी नदी ही कायम प्रदूषणमुक्त राहावी आणि नव्याने वाढणाऱ्या वसाहतीमधील मैलामिश्रित सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च प्रस्तावित आहे.
काही ठिकाणी मुख्य वाहिन्यांना या भूमिगत वाहिन्यांना न जोडल्या गेल्याने पावसाच्या पाण्याची भूमिगत पाइप ही चेंबरला जोडलेली आहे. भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व घरांचे चेंबर याचा नकाशाही नगरपंचायतीकडे नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्पाकडे नदीपात्राजवळून जाणा-या वाहिन्या व चेंबर अनेक ठिकाणी फुटल्याने दुषित पाणी नदीपात्रात मिसळते.