- आळंदी, चाकण, राजगुरूनगर बरोबरच आता देहूचाही प्रस्तावित महापालिकेत समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का? याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
आळंदी, देहू, राजगुरूनगर, वाघोली या भागात लोकसंख्या वाढलेली आहे. हा पट्टा एकत्र करावा लागणार आहे, तिथं नवी महापालिका स्थापन करावी लागेल. मी त्या दृष्टीने पावलं टाकतोय. पुणे, पिंपरी-चिंचवडला रिंग रोड झाल्याशिवाय पर्याय नाही. त्या कामासाठी ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मेट्रोचे जाळं सर्वत्र पसरावे लागणार आहे. तरच वाहतूक कोंडी सुटणार आहे.
महापालिकेत नगरसेवक असले पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात. परंतू, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सर्वाेच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नगरसेवक नसल्याने आयुक्तांना सर्व अधिकार आहेत, तुम्ही शहरहिताचे काम करून घ्या. पवार पुढे म्हणाले, विकासाचे काही घेणेदेणे नाही. ते लोक विकासाला विरोध करत असतात. चाकण, खेड, आळंदी ही नवीन महापालिका करावी लागणार आहे. त्याचे नियाेजन सुरू केले आहे.