- ‘फायर अलार्म आणि प्रोटेक्शन सिस्टम’ (एफएपीएस) यंत्रणा बसविणे बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- शालेय वाहतूक करणाऱ्या बसला फायर अलार्म आणि प्रोटेक्शन सिस्टम (एफएपीएस) यंत्रणा बसविणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. यामुळे वाहनाला आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहनातून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळणार आहे.
शालेय वाहतूक करणाऱ्यांकडून सुरक्षिततेविषयक खबरदारी घेतली जात नसल्याने अपघात आणि आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत, या प्रश्नांवर ठोस उपाय म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२३ पासून वाहन उत्पादक कंपन्यांमार्फत तयार होणाऱ्या नवीन शालेय बसला आणि ऑल इंडिया टूरिस्ट परमिट धारण करणाऱ्या (ट्रॅव्हल्स) बसला ‘एफएपीएस’ यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे येणाऱ्या शालेय वर्षात स्कूल बसद्वारे होणारी वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे. आतापर्यंत ही यंत्रणा केवळ इलेक्ट्रिकल आणि हायब्रीड इलेक्ट्रिकल बसला कार्यान्वित होती. वाहनांमध्ये प्रवासी बसत असलेल्या जागेत स्मोक डिटेक्टर बसवावे लागणार आहेत, तसेच वाहनांच्या वर किंवा मागील बाजूला नायट्रोजन टाकी आणि पाण्याची टाकी बसवावी लागणार आहे.
सध्या काय आहेत अडचणी?..
राज्यात सध्या एकच कंपनी वाहनांसाठी लागणारे एफएपीएसचे सुटे भाग पुरवत आहे. त्यामुळे सध्या सुटे भाग मिळायला खूप उशीर होत आहे. त्यामुळे वाहनांना एफएपीएस यंत्रणा बसविताना अडचणी येत असल्याचे एका प्रसिद्ध कंपनीच्या संचालकांनी सांगितले.
पूर्वी इंजिनजवळ होती यंत्रणा…
पूर्वी केवळ इंजिनजवळ फायर डिटेक्शन आणि सपरेशन सिस्टम (एफडीएसएस) यंत्रणा बसविली जायची, इंजिनजवळ आग लागल्यास तेथे पाण्याची फवारणी व्हायची. मात्र, नंतर केलेल्या संसोधनात इंजिन ओव्हर हिट, शॉर्टसर्किटसह इतर काही कारणांमुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले. अशा दुर्घटनांमध्ये प्रवाशांचा होरपळून मृत्यू होतो. या त्रुटी लक्षात घेऊन ‘एफएपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. ही यंत्रणा बसविल्यावर तीन वर्षानी या यंत्रणेचे योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागेल,
आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने या यंत्रणेचे स्वागत करतो; पण याचा खर्च दोन लाखांनी वाढणार आहे. याचा अप्रत्यक्ष आर्थिक भार पालकांच्या खिशावर पडणार आहे, असे वाहतूक संघटनांचे म्हणणे आहे.