न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- ३ जून २०२० रोजी म्हणजेच मागच्या जून महिन्याच्या सुरुवातीला शहराला निसर्ग वादळाने झोडपले होते. वादळामुळे शहरातील शेकडो झाडे उन्मळून पडली होती. प्राधिकरण परिसरातील सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानमधील उन्मळून पडलेल्या अश्याच काही झाडांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील सदस्यांमुळे जीवदान मिळाले.
संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये अशोक, सुरू ,बदाम वृक्ष उन्मळून पडलेले होते. ४ जुलै रोजी ‘मॉर्निंग वॉक’ करीत असताना समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना एक त्या उन्मळून पडलेल्या झाडांची एक महत्वपूर्ण बाब नजरेस पडली. या उन्मळून पडलेल्या झाडांना नवीन पालवी फुटलेली निदर्शनास आली. त्यामुळे सदरची झाडे सरळ उभी केल्यास त्यांना जीवदान मिळू शकते हे लक्षात आल्यानंतर निगडी साईनाथनगर येथील प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विभाग अध्यक्ष विशाल शेवाळे, संघटक अजय घाडी, रामेश्वर गोहिल, सतीश मांडवे यांच्या मदतीने उन्मळून पडलेल्या ह्या झाडांना दोरखंड, बांबू आणि मोठे दगड यांचा योग्य वापर करून पुन्हा उभे केले आहे. त्या जागेवरच पुनर्रोपीत करण्यात आले.
या संदर्भात समिती विभागप्रमुख विशाल शेवाळे म्हणाले,” वादळामुळे आपल्या परिसरात देशी आणि विदेशी प्रकारची अनेक झाडे उन्मळून पडली. आजपर्यंत समितीच्या प्रयत्नांमुळे अनेक झाडांचे पुनंर्रोपण आम्ही यशस्वीरित्या पार पाडले आहे. परंतु, आजचा अनुभव फारच वेगळा होता. महिन्याभरानंतरही झाडांचे पुनंर्रोपण शक्य आहे हे यावरून सिद्ध झाले.
पर्यावरण अभ्यासक व समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “प्राधिकरणामध्ये शहराच्या इतर भागांच्या तुलनेत वृक्षांची आणि उद्यानांची संख्या जास्त प्रमाणात आहे. परंतु, असे असताना या उपजतच निसर्ग सौन्दर्य असलेल्या भागाकडे मात्र महापालिका उद्यान विभागाचे लक्ष फारच कमी आहे. अजूनही काही मोठी झाडे उद्यानात उन्मळून पडलेली आहेत. मशीन व क्रेनच्या साह्याने सदरची वजनदार झाडे पुन्हा पूर्वरत उभी करता येतील. उद्यानांची प्रामाणिक देखभाल मात्र होताना दिसून येत नाही. उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या उद्यानांची काळजी सुयोग्यपणे घेणे आवश्यक वाटते. श्रीमंत पालिकेकडे पुनर्रोपण प्रक्रियेकरिता एकही उपाययोजना नसणे हे दुर्दैव्याची बाब आहे. पावसाळ्यामध्ये पुनर्रोपण प्रभावीपणे राबविता येणे शक्य आहे.”