न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी – बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबरचा अर्ज भरून खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या २ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येईल, असे राज्य मंडळातर्फे कळविले आहे.
दहावी – बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने भरून घेतला जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ऑनलाईन अर्ज भरताना स्कॅन करून अपलोड करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल अनिवार्य केला आहे.
दहावीसाठी एक हजार रुपये व बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क व शंभर रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्जावर नमूद केलेल्या केंद्रशाळेत जमा करावी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लागला. त्यामुळे खासगी विद्यार्थी ऑनलाईन नावनोंदणीबाबत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावर शाळा सोडल्याच्या दाखल्याची तारीख ३० सप्टेंबर २०२० अशी ग्राह्य धरावी. तसेच विद्यार्थ्यांच्या वयासाठी ३० मे २०२० ही तारीख असेल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.