- लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- विद्युत अधिनियमातील कलम ५६ मधील तरतुदीनुसार, विज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही तर विज कंपनीने ग्राहकास १५ दिवसांची डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु असे असूनही महावितरणचे कर्मचारी ग्राहकांची विज परस्पर तोडत आहेत. अशा प्रकारांमध्ये लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची डिस्कनेक्शन नोटीस देण्याची सूचना करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंते उदय भोसले यांना केली.
सामान्य नागरिक जर आपले बील सातत्याने व रेग्युलर भरत असेल व पहिलेच बिल काही कारणाने भरणे अशक्य झाले त्यात महावितरणचीही कारणे असतात अशा परिस्थितीत विज कनेक्शन न तोडता सतत दोन महिने बिल न भरल्यासच नंतर कारवाई व्हावी तसेच नोटीस/ सूचना /१-२ दिवसाचा तरी अवधी बिल भरण्यास ग्राहकास द्यावा. कारण नकळवता कनेक्शन तोडल्यास ग्राहकास पुन्हा जोडणी शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या विस्कटलेल्या अवस्थेत अनेकांचे रागाच्या भरात महावितरण कार्यालयात मानसिक संतुलन बिघडून आक्रमक होणे, अंगावर धावून जाने, तोड फोड-करणे या घटना घडत आहे.
सामान्यावरील मानसिक ताण समजून, नियमित बिलभरणा करणाऱ्यास समजून घेऊन पद्धतीत योग्यबदल करावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळातील चेतन बेंद्रे, वैजनाथ शिरसाठ, आशुतोष शेळके, एकनाथ पाठक, सरोज कदम यांनी केली. तसेच दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी, प्राधिकरण परिसरातील लाईटच्या समस्या लवकर सोडवण्यात याव्यात, अशीही मागणी चेतन गौतम बेंद्रे यांनी केली आहे.