- फडणवीसांच्या आरोपाला कोल्हेंचे प्रत्त्युत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- शिरूर महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूरच्या पाचकंदील चौकात आज (दि. ६) पार पडलेल्या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्यवसायाच्या संदर्भाने टीका करत असताना; शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाटकं जमत नसल्याचा उपरोधिक टोला लगावला. या टीकेला उत्तर देताना आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे खरं आहे; मात्र त्यांना जनतेच्या मतांवर संसदेत जाऊन धंदा करता येतो हेही सत्य असल्याचं खा. अमोल यांनी सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अर्धसत्यच सांगितलं असल्याचंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.
खेड आणि शिरूरच्या जनतेने आढळराव पाटील यांना तीन वेळा संसदेत पाठवले, मात्र आढळराव पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करण्यात धन्यता मानली अशा उमेदवाराचे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय करू शकतात असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्याने शिरूरच्या जनतेसमोर पूर्ण सत्य मांडणे अपेक्षित होते मात्र त्यांनी आढळगाव नाटकं जमत नाहीत एवढंच अर्धसत्य सांगून, त्यांना जनतेच्या मतांचा जोगवा मागून संसदेत जाऊन धंदा चांगला करता येतो हे मात्र सांगितलं नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्याने शिरूर लोकसभा मतदार संघात पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी यांसारखे प्रकल्प का रखडले? अनेक विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम कोणी केलं यावर बोलणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या स्थानिक आणि निरर्थक मुद्द्यांवर वक्तव्य केलं असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.
माझ्या व्यवसायावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस देखील बोलले मात्र त्यांना नेमका कशाचा त्रास होतो, असा प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारलाय. मी इतरांसारखं रात्रीचं वेशांतर तर केलं नाही ना? छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचवून मी चूक केली का? आपल्या सारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्यांकडून हे अपेक्षित नव्हतं, तरीही धन्यवाद अर्धसत्य का होईना बोललात. पूर्णसत्य हेच आहे की आढळराव पाटलांना नाटकं जमत नाही पण जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा चोख जमतो, असं म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे
–