न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२५) :- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा या मागणीसाठी सकल मातंग समाजाने जनआक्रोश मोर्च्याचे आंदोलन केले होते. राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा सरकारने यासाठीची अंमलबजावणी सुरू केली, त्यानंतर कर्नाटक सरकारही ही अंमलबजावणी करीत आहे, मात्र यात महाराष्ट्र सरकारने कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याने, सरकारला जाग आणण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा मुंबईतील आझाद मैदान येथे काढण्यात आला. मातंग समाज हा पहिल्यापासून महायुती सोबत राहिलेला आहे असे आमदार अमित गोरखे म्हणाले.
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी लवकर पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिले आहे.
याप्रसंगी आ. अमित गोरखे, आ. सुनील कांबळे, आ. जितेश अंतापुरकर, आ. हेमंत ओगले, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आ. अविनाश घाटे, मा. आ ससाणे, सुधाकर भालेराव, गुंडिले, थोरात, राजू आवळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले, विष्णू कसबे, राम चव्हाण, मारुती वाडेकर, सुधार धूपे, पंडित सूर्यवंशी, मुखेडकर आदी समाजाचे नेते उपस्थित होते.
















