न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- गेल्या अनेक दिवसांपासून यशवंतनगर परिसरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असून, दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येची दखल घेत शिवसेनचे प्रदीप चव्हाण यांनी क प्रभाग अधिकारी दवंडे यांना परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता निवेदन दिले आहे.
या परिसरात महापालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा आहे. परिसरातील गोरगरिबांची मुले या शाळेत शिक्षण घेत असून त्यांना अशुद्ध पिण्याचे पाणी प्यावे लागते. त्यामुळे आजपर्यत शाळेतील अनेक विद्यार्थी साथीच्या आजारांना बळी पडले असून काही महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सतत या समस्येचा पाठपुरावा करूनही प्रशासन याकामी लक्ष घालत नाही. त्यामुळे नागरिकांचे सामाजिक व आर्थिक आरोग्य बिघडले असून प्रशासनाने लवकरात लवकर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल असे शिवसेनेचे प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्रा. दत्ता भालेराव, कुणाल जगनाडे, संभाजी मासुळकर, चंद्रशेखर कणसे, अनिल कोकिरकर आदी उपस्थित होते.