न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र ( महाराष्ट्र शासन ) तथा समाज भूषण पुरस्कार प्राप्त अरुण पवार आणि धारूरचे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांच्या वतीने जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर भंडारा डोंगर या ठिकाणी सेंद्रिय शेतीतील केसर आंब्याची जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी रास भरण्यात आली.
याबरोबरच पिंपळे गुरव येथील हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, तसेच धारूरमधील भैरवनाथ महाराज, तुळजापूर येथील तुळजाभवानी माता, पिंपळे गुरवमधील तुळजाभवानी माता आदी देव देवातांच्या चरणी केशर आंब्याची रास भरून आशीर्वाद घेतले.
याबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, आंबा हे फळांचा राजा मानले जाते आणि आपल्या संस्कृतीत ते समृद्धी, गोडवा आणि उत्तमतेचे प्रतीक आहे. आपल्याकडे परंपरेनुसार या ऋतुतील पिकणारे आंबे देवाच्या चरणी अर्पण म्हणून ठेवण्याची परंपरा आहे. श्रींच्या चरणी ही अल्प सेवा अर्पण करताना मन आनंदाने आणि समाधानाने भरून गेले. शेतकऱ्याच्या कष्टाला श्रींचा आशीर्वाद लाभो, हीच प्रार्थना.













