न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावे, परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंळाची अमलबजावणी करावी, हकीम कमिटीच्या सुत्रानुसार रिक्षाची ३ वर्षे रखडलेली भाडेवाड करण्यात यावी, रिक्षा इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांची ३० जून पर्यंत चर्चा करावी. अन्यथा ९ जुलैपासुन बेमुदत संप करण्याचा इशारा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबई येथील ९ जून रोजीच्या मेळाव्यात दिला होता, परंतु, महाराष्ट्र सरकारने मात्र, ३० जुन पर्यंत रिक्षा चालकांच्या प्रश्नावर चर्चा केली नाही. या मुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकासह महाराष्ट्रातील वीस लाख रिक्षा चालक मालक ९ जुलै पासुन बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कृती समिती महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत माहिती देण्यात आली. या वेळी शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, पुणे रिक्षा फेडरेशनचे, प्रदीप भालेराव, प्रियदर्शनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आनंद तांबे, शिवाजीनगर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रवळे, बापू धुमाळ, पुणे कॉटोमेंट रिक्षा संघटनेचे अनिल यादव, प्रकाश झाडे, सदाशिव पवार, लखन लोंढे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
हा संप सरकारने आमच्यावर लादला असुन नागरिकांची गैर सोय झाली त्यास सरकार जबाबदारी आहे, असे अशोक साळेकर म्हणाले. रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी हा संप असुन पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी सहभागी व्हावे या साठी मि स्वतः सर्व संघटना अध्यक्षांना भेटणार असल्याचे प्रदीप भालेराव यांनी सांगितले. पुणे शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी शांततेच्या मार्गने संपात सहभागी व्हावे, असे आव्हान आनंद तांबे यांनी केले आहे. महाराष्ट्रभर हा संप करण्यात येणार असुन, संपात मुंबई, नवी मुंबई, नागपुर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह विस लाख पेक्षा अधिक रिक्षा चालक सहभागी होणार आहेत.
या साठी महाराष्ट्रभर जन जागृती करण्यात आली असुन, बाबा कांबळे यांनी मराठवाडा, कोकण, विदर्भाचा दौरा करुन, ठिक-ठिकाणी मेळावा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जन जागृती झाली आहे. गेले अनेक वर्षापासुन रिक्षा चालकांचे प्रश्न न सुटल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये तिव्र संताप आहे, आणि तो ९ जुलैच्या आंदोलनात रस्त्यावर दिसुन येईल.















