न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील कचरा समस्येविषयी आक्रमक भूमिका घेत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या घरासमोर “डस्टबीन” आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि. १५) रोजी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये अपना वतन संघटनेच्या वतीने अनेक मुद्दे मांडण्यात आले . सदरची बैठक अर्धा तास चालली यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पिंपरी चिंचवड शहरातील कचराप्रश्नी बैठकीमध्ये विविध मुद्दे उपस्थित केले. त्यात काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, चिंचवड, भोसरी परिसर व पिंपळे सौदागर सोसायट्यांमधील रोझ लॅन्ड सोसायटी, मॉँट व्हर्ट सोसायटी ठिकठिकाणी कचरा साचलेला असून त्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. शहरातील झोपडपट्यांमध्ये सुद्धा कचरा मोठ्या प्रमाणवर पसरलेला आहे. पूर्वीप्रमाणे घंटागाड्या येत नसल्याने व त्या परिसरात कचरा कुंडी नसल्याने घरातील कचरा अनेकदिवस साठून राहतो. त्यामुळे तो कचरा इतरत्र टाकला जातो. कचरा संकलन व वाहन करण्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून योग्य काम होताना दिसत नाही. सध्याच्या बनविलेल्या गाड्या या पूर्वीपेक्षा मोठ्या आकाराच्या असल्याने त्या अंतर्गत रोडवर सुद्धा जाऊ शकत नसल्याने सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे. या गाड्यांची उंची जास्त असल्याने महिलांना कचरा टाकता येत नाही. शिवाय या गाड्यांमध्ये पडलेला कचरा भरण्यासाठी उपाययोजना नाही.
याबाबत आयुक्तांना विविध उपायही सुचविलेले. कचरा संकलन व वहन करण्याची जबाबदारी ज्या कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानी जर व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कडक कारवाईची करण्यात यावी. प्रत्येक प्रभागामध्ये कचरा उचलण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर त्याना जबाबदार धरून योग्य ती कारवाई व्हावी. वस्ती, छोट्या कॉलन्या यामध्ये छोटे रस्ते असल्याने त्याठिकाणी छोटी वाहने किंवा घंटागाड्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दयाव्यात. ज्या ठिकाणी कचरा कुंड्या आवश्यक आहेत, त्याठिकाणी कचराकुंडी उपलब्ध कराव्यात व तेथून कचरा उचलण्यात यावा. मोठमोठ्या सोसायट्यांमधील कचरा आधुनिक टेक्नोलोजिच्या माध्यमातून नष्ट करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का याबाबत विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणाऱ्या नागरिकांवर कठोर दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी, अशी माहिती अपना वतन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी दिली.
या बैठकीस अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटिका हेमलता परमार, प्रभारी शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा, प्रदीप गायकवाड, तौफिक पठाण, अस्लम शेख, विशाल निर्मल यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.












