न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०१९) :- रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस चालक, हमाल माथाडी, बांधकाम मजूर, टपरी पथारी हातगाडी धारक, शेतमजूर आदी घटकांमध्ये कार्य करणाऱ्या महाराष्ट्रतील तीनशे पेक्षा अधिक संघटनाची बैठक नुकतीच कराड येथे घेण्यात आली. या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, सांगली, नांदेड, ठाणे, बीड, पनवेल, लातूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील असंघटित कामगार कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी “कष्टकरी जनता आघाडी” या नावे राजकीय महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तीनशे पेक्षा अधिक संघटना यात सहभागी आहेत. कष्टकरी जनता आघाडीच्या राष्ट्रीय संघटकपदी कष्टकरी कामगार पंचायात अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांची निवड करण्यात आली. मुख्य संघटक म्हणून नरेंद्र गायकवाड (नांदेड), गफार भाई नदाफ (कराड), मारुती कोंडे( नवी मुंबई), महेश चौगुले (सांगली), मच्छिंद्र कांबळे (लातूर) आदिची निवड करण्यात आली आहे.
भारतात ४० कोटी असंघटित कामगार असून महाराष्ट्रात तीन कोटी पेक्षा अधिक असंघटित कामगार आहेत. यात रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस चालक, बांधकाम मजूर, हमाल माथडी कामगार, शेतमजूर, टपरी, पथारी, हातगाडी धारक, कागद, काच पत्रा वेचक धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई कामगार महिलासह १०८ घटकांचा सहभाग आहे. या सर्व घटकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी लवकरच पुणे येथे बैठक होणार असून यात पुढील राजकीय भूमिका ठरवण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.


















