- शाळा-कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने सैनिक बनले पाहिजे – निवृत्त मेजर नवनाथ मुर्हे
- विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करावा – डॉ. धनंजय वर्णेकर
- शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक निग्रह व मनोबलाची निर्मिती – अमोल भागवत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे रविवारी (दि. २६) रोजी सालाबादाप्रमाणे या वर्षीही प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे माजी लष्करी निवृत्त अधिकारी मेजर नवनाथ मुर्हे व सुभेदार राजेश कापडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेविका स्विनल म्हेत्रे, क्रीडा सभापती संजय नेवाळे, नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, तसेच आयआयबीएम ग्रुपचे संस्थापक धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख डॉ. तेजस्विनी गायकवाड, प्राध्यापक आदित्य वर्तक, गिरीश काटे, मुकूल होशिंग, पिटर गोम, एकता सिंग, कु. प्रतिक्षा डफळ, संतोष घाडगे व कॉलेजचे सर्व विद्यार्थी व पालक आदींच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने विविध देश भक्तीपर गीतं-गायन, विद्यार्थ्याची भाषणे तसेच डिप्लोमा प्रथम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी महिला-मुलींवर वाढते एसिड हल्ले याबाबत प्रत्याक्षिकं दाखवून जनजागृती केली. सर्व प्रमुख पाहुण्यांचे व आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधील सर्व शिक्षकवर्ग यांचे स्वागत व सत्कार समारंभ कॉलेजच्या तृतीय वर्षामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यानी केले.
माजी लष्करी निवृत्त अधिकारी मेजर नवनाथ मुर्हे यांनी विद्यार्थ्यांसमोर लष्करी सेवेमधील काही गोष्टींचा उलगडा करीत, काही अनुभव कथन केले. तसेच विद्यार्थ्यामध्ये देशाबद्दलची आत्मीयता, देशाबद्दल प्रेम व देशसेवेसाठी काहीतरी करण्याची जिद्द वाढीस लागावी यासाठी शाळा-कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने देशसेवेसाठी सैनिक बनले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.
नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला केवळ अभ्यासात झोकु न देता, विविध खेळ खेळले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअरसाठी वाव आहे. या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून, आपले व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे. नगरसेवक दत्ता साने यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी व पर्यावरणाविषयी माहिती दिली. त्याबद्दल मुलांमध्ये कुतुहूल जागृत केले.
आयआयबीएम ग्रुपचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कायद्याबाबत जागरूक रहावे. वाहतूक नियमांची शिस्त पाळावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत-सुंदर भारत अभियानाद्वारे आपला परिसर स्वच्छ राखण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवून इतरांसमोर स्वच्छतेचा आदर्श प्रस्थापित करावा.
आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘औद्योगिक व शहरी समाजात गुन्हेगारी वाढलेली दिसते. कारण तेथील सामाजिक वातावरणाचा यांत्रिकता, कौटुंबिक नियंत्राणाचा अभाव, कुटुंबाबाहेरील घटकांचा प्रभाव इत्यादींमुळे शिथिलता आलेली असते. मुले स्वतंत्र होऊ पाहतात. शहरांतील मुलांच्या टोळ्या असतात व अशी मुले छेडछाड, दंगा, चोरी इ. बेकायदेशीर कृत्ये करीत असतात. अर्थात सामाजिक परिस्थिती गुन्हेगारीस कारणीभूत असली तरी एकाच वातावरणातील सर्वच मुले गुन्हेगार होत नाहीत. कारण बाह्य परिस्थिती एकच असताना चांगले वर्तन करण्यासाठी आवश्यक असलेला आंतरिक निग्रह व मनोबल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून होते. सामाजिक व धार्मिक निष्ठांचा अभाव आज भारतात व महाराष्ट्रातही विविध क्षेत्रांमध्ये दिसतो. जातीयता, राजकीय हेवेदावे, स्वार्थ यांनी डागाळलेले चेहरे सगळीकडेच आहेत. कोणत्या व्यक्तींवर, कृतींवर, ध्येयांवर विद्यार्थ्यांनी श्रद्धा ठेवावी, याचे मार्गदर्शन शिक्षणक्षेत्रासारखे पवित्र माध्यम आज करीत आहे. आज शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना विद्यार्थिदशेतच आदर्श आत्मसात करण्याकरिता कुटुंब व शाळा या दोन्हीच्या समन्वयाद्वारे गुणात्मकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी कार्य होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल रनदिवे हीने, नियोजन एकता सिंग यांनी केले. आभार प्रदर्शन कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी केले.