न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- हिंगणघाट किंवा औरंगाबादमधील महिलेला जिवंत जाळून ठार केले, या महिला अत्याचाराच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहे. यामुळे महाराष्ट्राची देश पातळीवर प्रतिमा मलीन होत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार लवकरच “दिशा” कायदा करणार आहे. या कायद्यात घटना घडल्यापासून ७ दिवसात तपास,२१ दिवसांत कनव्हेकशन होवून २५ दिवसात आरोपीस शिक्षा होणारच, अशी कायद्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
पाटील यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आकुर्डी येथील डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस के जोशी, डी वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन आदी प्राचार्य, प्राध्यापक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर डॉ. शलाका पारकर यांनी गृह राज्यमंत्री पाटील यांची ओळख व परिचय सांगितला.
पुढे ते म्हणाले कि, कुणीतरी आपली खोड काढत असेल तर महिलांनी पुढे येवून तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करा. यामुळे समाजातील विकृतीला वेळीच पायबंदी घालता येईल. सध्या मंदीमुळे बांधकाम क्षेत्रात उदासीनता आहे. परकीय गुंतवणुकदारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड-पुण्यासह इतर शहरात गोर गरिबांना परवडेल अशी घरे बांधली जाणार आहेत. सध्या शहरात भेडसावत असणाऱ्या पार्किंगच्या समस्यांवर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेवून या समस्यांवर मात करीत नवीन संकल्पना शोधावी. जेणेकरून दळणवळण सुरळीत होण्यास मदत होईल. आपल्या सूचनांची शासन दरबारी दखल घेवून तुमची कल्पना अमलात आणली जाईल. पुणे शहराला कृत्रीम बुद्धिमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हब बनविण्याचा मानस आहे. तर नोकऱ्या उपलब्ध होण्याच्या हेतूने कोल्हापूरला स्टार्टअप सुरू करण्यात येणार आहे. सध्या जीडीपी कमी होत आहे. नोकऱ्या कमी होत आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांवर रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ जस्मिता कौर यांनी केले. तर आभार डॉ. विजय वाढई यांनी मानले.