न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- पाणीपुरवठा विभागाचे अपयश झाकण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाचे नाव देत शहरवासियांवर लादलेली पाणीकपात हे वर्ष संपेपर्यंत कायम राहणार असल्याची स्पष्ट कबुलीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरासाठी अतिरिक्त ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला जाणार असून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ६ डिसेंबरपर्यंत हा पाणीसाठा उपलब्ध होईल, असे आयुक्तांनी सांगितले.
यामुळे पुढील वर्षभर शहरवासियांवरील पाणीकपात कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. राहणीमानयोग्य शहराचे सर्वेक्षण सुरू आहे. पाणी समस्येमुळे या सर्वेक्षणातील गुणांकन घसरण्याची भिती आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.
पाणीपुरवठ्याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात पाण्याची समस्या कमी झाली आहे. दररोज पाणीपुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य नाही. सध्या रावेत बंधाऱ्यातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्षमतेमध्ये वाढ करण्यावी आवश्यकता आहे. अतिरिक्त १०० एमएलडी पाणी उचलण्यासाठी क्षमता बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याबरोबर दररोज पाणीपुरवठा करत असताना आणखी किमान ३० ते ३५ एमलएडी अतिरिक्त पाणीसाठा महापालिकेला उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानंतरच शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य असल्याचे हर्डीकर म्हणाले.