- अन्यायकारक वागणूकीच्या विरोधात आयुक्तांवर गुन्हा दाखल करायचा?
- राष्ट्रवादीच्या ज्ञानेश्वर कस्पटे यांचा उद्विग्न सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- सध्यातरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर योग्य नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा गरजेची आहे. अधिकाऱ्यांकडून चुका, हलगर्जी, दिरंगाई झाल्यास त्यांना योग्य ती समज आणि तरीही सुधारणा न झाल्यास थेट कडक कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. तसेच अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यामध्ये योग्य तो समन्वय असायला हवा. मात्र, महापालिका आयुक्त अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार घडताना दिसत आहे. प्रशासनाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पडायलाच हवी. एखादी समस्या वेळीच न सोडवील्यामुळे शेवटी तिचा जनतेलाच त्रास होणार आहे. त्यामुळे जनता या समस्येचा जाब संबधित लोकप्रतिनिधीलाच विचारणार. त्यात गैर काय? अशा वेळेस परिस्थितीही टोकाची होणार. शहरातील नागरिक कायदा हातात घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यास जबाबदार शेवटी महापालिकेचे प्रशासन व संबंधित अधिकारीच ठरतो. मग महापालिका आयुक्त अशा कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांना समज देण्याऐवजी करदात्या नागरिकांनाच चोर समजून शिक्षा देणार असेल, शहरातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची. आयुक्तांची ही तऱ्हा म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ असा होतो. त्यामुळे आयुक्तांच्या भूमिकेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आयुक्तांनी आपली भूमिका बदलून पारदर्शक व स्वच्छ नीती आमलात आणावी अन्यथा शहरातील जनता आपली पुन्हा नागपूरला रवानगी करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे की, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराद्वारे असे समजते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्तव्य बजाविताना लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून वारंवार मारहाण व तोंडाला काळे फासणे, कोंडून ठेवणे यासह अन्य प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारीवर्गात भीतीदायक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. यापुढे सरकारी कामकाजात मुद्दामून अडथळा आणला तर संबंधीतांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असा निर्णय आपण घेतला आहे. याबाबतीत मी आपल्या मताशी सहमत आहे. अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण, तोंडाला काळे फासणे, कोंडून ठेवणे इत्यादी बाबी अत्यंत चुकीच्या आहेत. मी आपल्या मताशी सहमत आहे. परंतु, या माजलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असे हल्ले का होतात याचा आपण आयुक्त या नात्याने अभ्यास केला आहे? कोणताही लोकप्रतिनिधी व शहरातील नागरिक टोकाचे पाउल का उचलतो, याचे कारण काय तर, नागरिकांना महापालिकेच्या संबधित विभागाकडून, अधिकाऱ्याकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक. दोषी कामचुकार अधिकारी व कर्मचारी स्वतःला महापालिकेचे जावई समजतात व त्या पद्धतीने संबंधित लोकप्रतिनिधी व करदात्या नागरिकांना तशी वागणूक देतात. अशा परिस्थितीत संबंधितांकडून गैरवर्तवणूक होणार. म्हणून आपण चोर सोडून सन्याशाला फाशी देणार? हा अधिकार तुम्हाला दिला कोणी. याचे उत्तर आपणाकडून मला अपेक्षित आहे.
या अशा माजलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुंडली आयुक्त या नात्याने आपणाकडे सर्वप्रथम हवी. अशा बेजाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती तपासून त्यांना जाब विचारा. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी कडक पावले उचललुन अशा अधिकाऱ्यांना समज द्या. अन्यथा जनप्रशोभ उग्र झाल्यास आपली रवानगी पुन्हा नागपूरला निश्चितच समजा, असे या निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी मी आपली वेळ मागत आहे. मला ती आजतागायत आपण दिली नाही. आजपर्यंत आपणास अनेक निवेदने दिली. मात्र, याबाबत आपणाकडून मला कोणताही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. एकीकडे कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण खाकीचे संरक्षण देता. दुसरीकडे मला आपणाकडून अन्यायकारक वागणूक मिळत आहे. मग या अन्यायाविरोधात मी आपणाविरोधात गुन्हा दाखल करायचा? अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांसाठी सेवा बजावितात. काही कामचुकार व मस्तवाल अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांना कायदा हाती घ्यावा लागतो. नागरिकांनी कायदा हाती न घेता सौजन्याने वागायला हवे या मताचा मी आहे. परंतु, त्यांच्यापुढे प्रशासन असे वातावरण तयार करते. त्यामुळे प्रसंगी नागरिक व लोकप्रतिनिधी आक्रमक होतात. यास महापालिकेचे आयुक्त या नात्याने सर्वस्वी आपणच जबाबदार आहात.
– ज्ञानेश्वर कस्पटे (पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता)