न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- नागरिकांना त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे राहणीमान योग्य निर्माण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दिनांक १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणा-या या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये राहण्यास योग्य शहर, महानगरपालिकेचे कामकाज व शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेवून सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग असून आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल स्थानांकन प्राप्त व्हावे याकरिता नागरिकांनी यामध्ये मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी एलईडी मोबाईल व्हॅन म्हणजेच राहण्यायोग्य शहर सर्व्हेक्षण रथाव्दारे करण्यात येणार आहे. या रथाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर राहूल जाधव, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मोनिका कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.