न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी चल पादुकांचे शनिवारी (दि. १३) आषाढी वारीसाठी परंपरेनुसार प्रस्थान होणार आहे. यंदा पालखीचा वापर करण्यात येणार नसल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे. शासनाच्या निर्णयानुसार मोजक्याच वारकऱ्यांसमवेत यंदा पादुका हेलिकॉप्टर अथवा वाहनाने थेट पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
प्रस्थान सोहळ्याबाबत सोमवारी (दि. ८) पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप विष्णोई यांनी बैठक घेऊन देऊळवाड्यातील संख्या कमी करण्याबाबत सांगितले होते. यात देवस्थानने ५० जणांना प्रस्थानावेळी प्रवेश देण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांच्या सूचनेनुसार ३५ जणांची परवानगी मागितली आहे. त्याबाबत निर्णय येणे बाकी आहे, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
प्रस्थानानंतर पादुका देऊळवाड्यात ठेवल्या जातील. १७ दिवस वारीच्या वाटेवर होणारी परंपरेची कीर्तन, जागराचे कार्यक्रम देऊळवाड्यातच होणार आहे. प्रस्थानाच्या दिवशी पहाटे चार ते साडेपाच माउलींच्या समाधीवर अभिषेक, दुधारती, आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा माउलींना नैवेद्य आणि दुपारी चार ते सहा वाजता प्रस्थान सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत होईल. प्रस्थान सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोशल मीडियावरून देवस्थानकडून करण्यात येणार आहे .
शुक्रवारी १२ जून रोजी तुकोबारायांचे देहूतून तर शनिवारी १३ जूनला माऊलींचे प्रस्थान आळंदीतून होणार आहे. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या वाहनांनी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. यावेळी पालख्यांसोबत केवळ काही मोजकी मंडळीच असणार आहेत. नेहमीप्रमाणे दशमीला या पालख्या पंढरपूरात दाखल होती.