न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पायी वारी करण्याची शेकडो वर्षाची परंपरा पूर्ण होऊ शकणार नाही. वाढत्या कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे प्रशासनाने पायी पालखी सोहळा हा अन्य सुरक्षित पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. मात्र शेकडो वर्षाची परंपरा असणारा पालखी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी फुल व फळझाडांच्या बियांचे संकलन करून येत्या पावसाळ्यात त्याचे रोपन करण्याचे आवाहन केले आहे.
त्याकरिता आजपासून (१३/०६/२०२०) घरीच राहुन पर्यावरण पूरक हरीत वारीस त्यांनी व त्यांचे समिती सहकारी अर्चना घाळी, विजय मुनोत, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, सतीश देशमुख, अमोल कानु, अँड विद्या शिंदे, श्रीमती कविता बेंडाळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, नाना संदीप कुंबरे, उमेश कांगुडे, प्रदीप ,मंगेश घाग, संदीप सकपाळ, गोपाळ बिरारी, जयेंद्र मकवाना, मनोज ढाके, विजय जगताप, मनोहर दिवाण, सुनील चौगुले, राम सुर्वे, बाबासाहेब घाळी, तेजस सापरीया, जयप्रकाश शिंदे, बळीराम शेवते, शिवाजी अडसूळ, लक्ष्मण इंगवले, राजू येळवंडे, नितीन मांडवे, अजय घाडी, सुरेश येरूनकर, शशिकांत इंगळे, तुषार मकवाना, महेश काकडे यांनी बियांचे संकलन करून सुरुवात केली आहे. पर्यावरण पूरक हरित वारीचा आनंद घरोघरी प्रत्येकास घेता येणार आहे.
या संदर्भात समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास समितीचे स्वयंसेवक पोलीस मित्र हे दरवर्षी पोलीस प्रशासनास सहकार्य करत असतात. गेल्या १८ वर्षांपासून समितीचे एसपीओ हे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वैष्णवांची सेवा करीत आले आहेत. यंदाच्या वर्षी सेवेमध्ये कोरोना संक्रमनामुळे सहभाग घेता येणार नाही. परंतु “मानस वारीने” पर्यावरण पूरक हरित बीज वारी पूर्ण करण्याचे समितीने ठरविले आहे.
“शुद्ध बिजा पोटी | फळे रसाळ गोमटी” अश्या पद्धतीने जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये वृक्ष, बी, फळ, फुल, जल, पक्षी यांना प्रतीके म्हणून समोर ठेवून आपले विचार समाजासमोर प्रगट केले आहेत. त्यामुळेच बीज संकलन करून समिती ह्या वर्षी अभिनव पद्धतीने “वारी” सोहळा साजरा करणार आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी पर्यावरणपूरक साजरी करून, सर्वांनी कोरोना विषाणूपासून संपूर्ण जगाला मुक्तता मिळण्यासाठी एकत्र यावे.