- खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस मानवता दिवस म्हणून साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून. 2020) :- भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणातील त्रूटी व गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे भारत चीन सीमेवर (‘एलएसी’) वीस जवानांचा बळी गेला. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘मानवता दिवस’ शुक्रवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वाकड येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते.
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन नायर, पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड. मोहम्मद तारिक सिद्दीकी रिजवी व शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, जॉन्सन वर्गीस, अजय जाधव, अब्दुल कादिर खान, जावेद शाह, सुजाता शाह, रेहाना शेख, डेविड काळे, डॅनियल सोनकर, अरुण मैराळे, दूराप्पा देवकर, सालार शेख, उपेंद्र मेनन, इमाम नदाफ आदी उपस्थित होते. कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते वाकड परिसरात नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी साठे म्हणाले की, दूरदृष्टी ठेवून देशाचा सर्वांगिण विकास करण्याचे धोरण कॉंग्रेसचे आहे. सक्षम परराष्ट्र धोरण, भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. देशात संगणक क्रांती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या धोरणामुळे आली. ‘गॅट’ कराराची सक्षमपणे अंमलबजावणी खासदार सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असताना तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकालात झाली. त्यामुळेच देश आधुनिक व सक्षम भारत म्हणून विकसीत होत आहे. विकासाचे हेच धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या सारख्या सक्षम युवा नेतृत्वाची देशाला गरज आहे. जगात वेगाने फोफावणारी कोरोनाची महामारी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद करावी, अशी मागणी फेब्रुवारी महिन्यात खा. राहुल गांधी यांनी केली होती. याकडे केंद्र सरकार व पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. परिणामी देशाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. तरी देखील आज देशात तीन लाखांहून जास्त कोरोना बाधीत रुग्ण आहेत. खा. राहुल गांधी यांची मागणी केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे तर कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते, असे ही सचिन साठे यांनी सांगितले.
स्वागत शहाबुद्दीन शेख, सुत्रसंचालन ॲड. मोहम्मद तारिक रिझवी आणि आभार राजन नायर यांनी मानले.