न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- कोरोना या जागतिक महामारीमुळे 25 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांसह गाव खेड्यांतील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील 35 लाखाहून जास्त लोकसंख्या असणा-या बलुतेदार गुरव समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातून उद्भवलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी गुरव समाजाला महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आंदोलन समितीचे समन्वयक प्रताप गुरव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील गुरव समाजाच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने बुधवारी (दि. 24) राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय समोर सोशल डिस्टन्स पाळून आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हा अधिकारी व तहसिलदार यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भानुदास पानसरे, देवस्थान ईनाम जमिन पुणे जिल्हा अध्यक्ष वसंत टांकसाळे, पुणे शहर युवा अध्यक्ष कृष्णा पानसरे आणि अॅड. के. डी. पानसरे उपस्थित होते. यानंतर पुणे निवासी जिल्हा अधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. तसेच आकुर्डी तहसिल कार्यालयासमोर प्रताप गुरव यांच्यासह पिंपरी चिंचवड गुरव समाज अध्यक्ष श्रीहरी गुरव, कार्याध्यक्ष पार्थ गुरव, सरचिटणीस भारत भोसले, उपाध्यक्ष नितीन गुरव, बारा बलुतेदार प्रदेश युवा अध्यक्ष विशाल जाधव यांनी आंदोलन केले व तहसिलदार गीता गायकवाड यांना निवेदन दिले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात 35 लाखांहुन जास्त बलूतेदार गुरव समाजाची लोकसंख्या आहे. त्यांचा पारंपरिक उदरनिर्वाहाचा मार्ग ‘‘ग्रामदेवतांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती’’ करणे हा आहे. या मंदिरांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती करून भाविकांकडून मिळणा-या दक्षिणेतून व बलुतेदार पद्धतीने गावातून मिळणा-या शिधा व वार्षिक पेंडी काडीचे बलुते यातून बलूतेदार गुरव समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतू, मागील तीन महिन्यापासून यातून मिळणारे उत्पन्न देखील पूर्ण बंद आहे. लाँकडाऊनमुळे राज्यातील 41000 पेक्षा जास्त मंदिरे बंद आहेत. यामध्ये देवस्थान इनाम जमीन असलेली मंदिरे – 18387 आणि ग्रामदेवतेची इतर मंदिर संख्या – 22623 आहे. “गुरव समाज” हा इसवी सन. 6 व्या, 7 व्या शतकापासून गावगाड्यातील एक बलुतेदार घटक म्हणून गावच्या सेवेपोटी ग्रामदेवतांची, पूजा अर्चा, मंदिर साफसफाई, दिवाबत्ती, अशी सेवा करून “देवासमोर येणाऱ्या किरकोळ दान दक्षिणेवर आणि घरोघरी जाऊन मागीतलेला पीठ-मीठ, कोरडा शिधा व वर्षाकाठी शेतकरी बांधवाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या बलुत्यावर वर्षानुवर्षे गांवात सुख, शांती, ऐश्वर्य, शांतता नांदावे म्हणून देवतांची मनोभावे पूजा करून गावाचे भले होवो अशी मनोभावे प्रार्थना करून गुरवसमाज जगत असतो.
मात्र कोरोना या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन नेमका सुगीच्या लग्नसराईच्या व गावोगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रा, वार्षिक उत्सवांच्या काळात झाला आहे. या सुगीच्या काळात मिळणा-या उत्पन्नावर बारा बलुतेदार वर्षाची आर्थिक बेजमी करीत असतो. परंतू बलुतेदारांचे इतर सर्वच दैनंदिन मिळकतीचे व्यवसाय बंद झाल्यामुळे हा समाज दुहेरी संकटात सापडला आहे. अशा दुहेरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावगाड्यातील बलुतेदार गुरव समाजाला महाराष्ट्र शासनाने विनाविलंब आर्थिक मदत करावी. यामध्ये राज्यातील प्रत्येक गुरव कुटुंबास उदरनिर्वाहासाठी दरमहा रुपये 10,000/- बँक खात्यावर जमा करावेत.; ग्रामदेवतेच्या, दैनंदिन पूजा अर्चा, दीप ,धूप, नैवैद्यासाठी व मंदिरे साफसफाईसाठी दरमहा रूपये 5,000/- हजार शासनाने अनुदान म्हणून गुरव पुजाऱ्यांना द्यावेत.; खरीप हंगाम चालू झाल्यामुळें विशेष बाब म्हणून देवस्थान ईनाम जमिनीवर एकरी रुपये 20,000/- इतके विना अट पीक कर्ज मिळावे आणि बलुतेदार गुरव समाजातील विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची पूर्ण फी माफ करावी. तसेच आवश्यक ते शैक्षणिक साहित्य मोफत द्यावे. या मागण्या करण्यात आल्या आहेत.