न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- तीर्थक्षेत्र देहू विकास आराखड्यांतर्गत इंद्रायणी नदीवर उभारण्यात आलेला येलवाडी ते देहुला जोडणारा पूल गेल्या ५ वर्षांपासून वापराविना पडून आहे. बांधकाम विभागाने त्वरित हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी आमरण उपोषण करण्याच इशारा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भसे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
देहू विकास आराखड्यांतर्गत पाच वर्षांपूर्वी इंद्रायणी नदीवर येलवाडी ते देहू यांना जोडणारा पूल उभारण्यात आला. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, पूल अजूनही वापरासाठी खुला करण्यात आला नाही. येलवाडी हद्दीमध्ये शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील काही तांत्रिक अडचणींमुळे पूल आणि त्यापुढील रस्ता खुला करण्यात आला नाही.
यामुळे पुलाच्या परिसरात झुडपे उगवली असून, तो वापराविना पडून आहे. पुलापासून ते बायपासपर्यंतचे शेतकरी रस्त्यासाठी सहकार्य करीत असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाशी संवाद साधला. परंतु, प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीच्या कामाची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे, असा आरोप भसे यांनी केला आहे.