न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- गेल्या काही वर्षापासून पुण्यात राहणाऱ्या १८ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला गुरुवारी (दि. २२) भारतीय नागरिकत्वाची शपथ दिली. त्यामुळे या नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या सुनावण्या प्रलंबित होत्या.
याबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, भारतात लाँग टर्म-व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानी, बांग्लादेशी नागरिकांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून भारतीय नागरिकत्व दिले जाते. यात भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर १८ पाकिस्तानी व एक बांगलादेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले. टर्म प्रमाणपत्र हाती पडल्यानंतर या नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.