- वाढीव वीजबिलांच्या समस्यांचा महावितरणापुढे वाचला पाढा..
- आठवडाभरात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे महावितरणाचे आश्वासन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- प्रभाग क्र. १२ रुपीनगर तळवडे शहर शिवसेनेच्या वतीने प्राधिकरणातील महावितरण उपविभाग अति. कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन, या भागातील ग्राहकांना येणाऱ्या वाढत्या वीज बिलाच्या तक्रारी व समस्यांबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच, वारंवार वीज बिलाच्या तक्रारी करूनही समस्या जैसे थेच का आहेत? याचा जाब विचारण्यात आला. चर्चेदरम्यान प्रभागातील नागरिकांना महावितरणाकडून भेडसावणारे काही मुद्देही बैठकीत उपस्थित करण्यात आले. तसेच त्यावर तोडगा काढून, तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणाकडे केली आहे.
शिवसेनेच्या वतीने रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे महावितरण उपविभाग, अति. कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य तथा शिवसेनेचे शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर, विभाग संघटिका आशाताई दयानंद भालेकर, विधानसभा चिटणीस अमित शिंदे, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, उपाधिकारी युवासेना सुनिल समगीर, जेष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे, दयानंद भालेकर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १२ रुपीनगर-तळवडे भागातील वीजबिल समस्याबाबत आम्ही शिवसेना शाखेमार्फत आपणांस वारंवार पत्राव्दारे व प्रत्यक्षात भेटून चर्चा केली आहे. मात्र समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. नादुरुस्त मीटरचे एक वर्षापासूनचे पैसे भरूनसुद्धा ग्राहकांस मीटर वेळेत मिळत नसल्यामुळे, त्यांनी न वापरलेल्या रीडिंगचे सरासरी बिल महावितरणाकडून आकारले जात आहे. ग्राहकांचे मीटर RMO केलेले आहे तरीही, ग्राहकांस वीज बिल देणे चालूच आहे, ते त्वरित बंद करण्यात यावे. मीटर जागेवर (LIVE )असूनसुद्धा सिस्टमला PD /RMO दाखवला जात आहे. मीटर रिडरने रीडिंगचा फोटो घेतलेला असताना मीटरवर जास्त रीडिंग असल्यास ऑफिसमधून फोटो स्क्रप केला जातो. बिलावरील रिडींगच्या तारखेस रीडरने घेतलेला फोटो त्याच तारखेस दाखल करावा. रीडिंग घेतांना बिलिंग रूटच्या एक वाक्यतेनुसार रीडिंग घेतल्यास रीडिंग व्यवस्थित होईल, त्यासाठी महावितरणाच्या सिस्टीममध्ये बदल करावा. विजबिलावर मीटर रीडिंग घेवून उपलब्ध नाही असे वाचण्यात येते याचा अर्थ काय? रीडिंग १ तारखेला आहे ग्राहकांस ५ तारखेला मेसेज येतो. बिल १५ तारखेला येतात शेवटची तारीख १६ असते यावर ताबडतोब दुरुस्ती करावी. ग्राहकांस ० रक्कमेचे तसेच जास्त रक्कमेचे बिल असल्यास कर्मचारी बिल ग्राहकांस देत नाहीत. महावितरणच्या चुकीमुळे विज बिल जास्त आल्यास ते बिल दुरुस्त करून आपल्या कर्मचाऱ्यामार्फत ग्राहकांच्या घरी पोहच करावे. ग्राहकांनी वीज बिल दुरुस्तीस दिल्यास, तीन-तीन महिने बिल दुरुस्त होत नाही. ग्राहकांस ० ते ३० युनिट रीडिंग येत असल्यास मागील दोन वर्षापासून फेरतपास झाला नाही, यातच महावितरणाच्या कार्यपद्धतीचा बेजबाबदारपणा लक्षात येतो. रोलेक्स (ROLEX) कंपनीचे खराब मीटर अजूनही बदली झाले नाहीत ते त्वरित बदली करावे. ज्या ग्राहकांचे मीटर जास्त उंचीवर आहेत, त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जात नाही. मीटर रीडरमार्फत तसा दाखला देण्यात यावा. ते मीटर ताबडतोब महावितरणाच्या कर्मचाऱ्याव्दारे त्वरित खाली घ्यावेत, अशा मागण्या निवेदनात आहेत.
दरम्यान ग्राहकांच्या मीटरच्या अडचणी, तसेच वाढीव वीज बिलासंदर्भात सेक्शन अधिकारी, लाईन स्टाफबरोबर चर्चा करून मार्ग काढू. काही अडचणी लगेच सूटतीलही, काहींना वेळ लागेल. मात्र, महावितरणाच्या वतीने ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेऊन, त्या प्रामाणिकपणे सोडविण्याला प्राधान्यक्रम देऊ, असे आश्वासन प्राधिकरणाचे अति. कार्यकारी अभियंता यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन मुख्य अभियंता, रास्तापेठ पुणे, अधीक्षक अभियंता, गणेशखिंड, पुणे, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग यांनाही पाठविले आहे.
रुपीनगर परिसरात पालिकेच्या खोदकामामुळे सर्व्हिस केबल नादुरुस्त होत आहेत. पालिका हात वर करते. महावितरणाकडून लक्ष देले जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. त्यावर महावितरणाकडून ठोस कार्यवाही व्हावी. तसेच मीटरची देखील कार्यालयात वानवा आहे. सत्तेत असताना तरी आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका.
– नितीन बोंडे, शिवसेना विभागप्रमुख…
शहरात महावितरणाच्या वेळकाढूपणामुळे शहरातील ग्राहकांना वाढीव वीजबिलांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा खेटेमारून सुद्धा त्यांचा वाढीव वीजबिलांचा गोंधळ संपत नाही. त्यामुळे महावितरणाने ‘वीज बिल दुरुस्ती केंद्रा’ची उभारणी करावी. त्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस राखीव ठेऊन, अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याकडे भर द्यावा. जेणेकरून ग्राहकांचे प्रश्न सुटतील. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही व महावितरणाच्या कारभारावर शिंतोडे उडणार नाहीत.
– संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक…