- पालिकेने स्वतःच्या खिशातून महावितरणाचे नुकसान भरून द्यावे – संतोष सौंदणकर….
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ‘जेसीबी’ व ‘पोकलेन’च्या सहायाने शहरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या खोदकामात महावितरणच्या विद्युत वाहिन्या उघड्या पडल्या आहेत. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी जमा होऊन अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्याने वायर बस्ट झाल्या आहेत. त्याचा खर्च महावितरणलाच करावा लागतो. महानगरपालिकेच्या चुकीच्या कामाची शिक्षा महावितरणला नाहक भोगावी लागते. महापालिकेने यापुढे स्वतःच्या खिशातून महावितरणाचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी आयुक्तांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहराच्या बहुतांश भागामध्ये रस्त्याची कामे काढली आहेत. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ‘जेसीबी’ व ‘पोकलेन’च्या सहायाने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या खोदकामात महावितरणच्या विद्युत वाहिन्या उघड्या पडल्या आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या मोठ्या प्रमाणावर तुटलेल्या आहेत. त्या दुरूस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिका घेत नाही. अशावेळी नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे संबंधित भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रशासनाला तात्पुरती दुरूस्ती करावी लागते. त्याचा खर्च महावितरणलाच करावा लागतो. महानगरपालिकेच्या चुकीच्या कामाची शिक्षा महावितरणला नाहक भोगावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात खोदकाम केले जात आहे. अद्यापही हे काम सुरूच आहे. खोदकाम करताना विद्युत वाहिन्या उघड्या पडल्या आहेत. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी जमा होऊन अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्याने वायर बस्ट झाल्या आहेत. वायर तुटल्यामुळे पुढील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले. महावितरणकडे नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार सुरू झाला. आज देखील अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यात विद्युत विभागाची कसलीही चूक नसताना समाजात महावितरणची बदनामी होऊ लागली आहे.
२४ तास पाणी पुरवठा योजना असेल अथवा रस्ते काँक्रिटीकरण, ही कामे महानगरपालिकेची आहेत. या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. या कामात उचकटलेल्या विद्युत वाहिन्या पुन्हा भूमिगत करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. कारण, सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत वाहिनीस काही अढथळे आल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला चांगला रस्ता खोदावा लागेल. त्यात नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशाचा विनाकारण अपव्यय होतो. यासाठी यापुढे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यापूर्वी विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतराचा विचार प्राधान्याने करावा. खोदकामात उघड्या पडलेल्या विद्युत वाहिन्या तुटल्यास किंवा भूमिगत करण्यासाठीचा खर्च महानगरपालिकेने घ्यावा, असे या निवेदनात सौंदणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.