- महाराष्ट्र राज्यातूनही मिळणार मोठा प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारने आधी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेतकऱ्यांचा वाढत रोष पाहता केंद्रानं शेतकऱ्यांना चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र, शेतकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीतून कुठलाही तोडगा निघाला नाही. नवे कृषी कायदे मागे घेण्याची आपली प्रमुख मागणी शेतकरी लावून धरत आहेत. तर केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यास अपयशी ठरली असून कृषी कायदे मागे न घेण्यावर अडून आहे. अशातच ‘आर या पार’ ची भूमिका घेत शेतकऱ्यांनी मंगळवारी, ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील ११ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, आरजेडी, ममता बॅनर्जी यांचे टीएमसी, अखिलेश यादव यांचे समाजवादी पार्टी, दिल्लीची सत्ताधारी आम आदमी पार्टी, तेलंगणची सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती आणि एनडीएची राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे.
सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान ८ तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदवेळी दुपारी ३ वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही, अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे ८ तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.
राज्यातील प्रमुख एपीएमसी मार्केट बंद
दरम्यान, महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी संप करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेता नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.