न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसें) :- भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन असलेल्या किसान २०१८ या २८ व्या कृषिप्रदर्शनाचे पुण्यात मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्या शेतकर्यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बुलढाणामधील बादलवाडी येथील गजानन उबरहांडे, मारूती उबरहांडे, शुभम उबरहांडे, गणेश उबरहांडे, अनिल उबरहांडे, श्रीकृष्णा उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, जालन्यातील तुपेवाडीतील राम कफरे, रघुनाथ मोरे, काशिनाथ मगर, सुखदेव खेडेकर, निभानी कफरे या शेतकर्यांचा समावेश होता. हे प्रदर्शन १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहील. या प्रदर्शनाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली आहे.
१५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ६००० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव-उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून सुमारे २ लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्या १०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.
मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकर्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्या संधींची माहिती घेऊ शकतील.
आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोप मधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकर्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे; भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले ३ दिवस म्हणजे १२ ते १४ डिसेंबर खुले असेल.
प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु.१००/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा kisan.net या संकेतस्थळावर व kisan.net मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणार्या शेतकर्यांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणार्यांना प्रवेश शुल्कात ५० रुपये सवलत मिळणार आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकर्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नाव नोंदणीची सोय केली आहे. आत्तापर्यंत ५,००० शेतक-यांनी किसान २०१८ साठी पूर्व नावनोंदणी केली आहे. आम्हाला ही संख्या ५०,००० पर्यंत ओलांडण्याची अपेक्षा आहे.
kisan.net मोबाईल अॅपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती १ महिना आधीपासूनच उपलब्ध आहे, जेणे करून शेतकरी व प्रदर्शक संस्थां मधील संवाद आधीपासूनच सुरु होईल. मोशी येथील प्रदर्शन स्थळ हे पुणे शहरापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२० – ३०२५२०२० / www.kisan.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.












