- पीएमपीच्या निवृत्त कर्मचा-यांचा सत्कार समारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात पीएमपीएमएलच्या चालक, वाहकांनी सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन २४X७ असे पुर्णवेळ काम केले. कोरोना कोविड -१९ चा संसर्ग होईल या भितीने अनेकांनी आपल्या सेवा बंद केलेल्या असताना ‘पीएमपी’च्या चालक, वाहकांनी शववाहिनीचीही अविरतपणे सेवा दिली. त्यांचे हे कार्य गौरवास्पद आहे. त्यांच्या या कार्याची निश्चित प्रशासन दखल घेईल असे प्रतिपादन पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीमएल) मधून निवृत्त झालेल्या सहा कर्मचा-यांचा निरोप समारंभ आणि सत्कार निगडी येथील दुर्गा देवी आगारात नुकताच करण्यात आला, यावेळी ढाके बोलत होते. यावेळी वाहतुक व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे, आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, पीएमपीएमएल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, संजय कुटे, हनुमंत लांडगे, आबा गोरे, सुनिल मोरे, सुभाष पालपिनकर, देवराम जगदाळे, दिंगबर चिंचवडे, महाद्रंग वाघेरे, निलेश जगताप, भगवान मोरे आदींसह कर्मचारी बंधू, भगिनी उपस्थित होते.
यावेळी वाहतुक व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे यांनी सांगितले की, पीएमपी हि परिवहन संस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व क्षेत्रासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात प्रवासी सेवा देत आहे. लवकरच पीएमआरडीएच्या सर्व कार्यक्षेत्रात सेवा विस्तार करण्यात येणार आहे. दोन्ही महानगर पालिकांचे आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने आगामी काळात दिडशे ‘ई – बसेस’ घेण्यात येणार आहेत. पीएमपी हि देशातील सर्वात जास्त ‘ई – बसेस’ व्दारे प्रवासी सेवा देणारी पहिली परिवहन संस्था आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पीएमपीचे साडेचार हजार कर्मचारी, वैद्यकीय, आरोग्य व पोलीस तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना तसेच हॉस्पिटल ते कोविड सेंटर आणि कोविड सेंटर ते घरी अशी रुग्णांना प्रवासी वाहतूक सेवा देत होते. रुग्णवाहिका चालकांनी ‘शववाहिका’ चालविण्यास असमर्थतता व्यक्त करताच पीएमपीच्या कर्मचा-यांनी ‘शववाहिकेची’ २४X७ सेवा दिली. तसेच श्रमिक ट्रेनव्दारे आपआपल्या गावाला जाणा-या श्रमिकांना शहरातून व ग्रामिण भागातून पुणे रेल्वे स्टेशन आणि उरुळी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी नियोजनबध्दपणे सेवा दिली. यातून दोन लाखांहून जास्त कामगारांना याचा लाभ झाला. एवढे मोठे काम संसर्गजन्य आजाराच्या काळात कामगारांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे करणे प्रशासनाला शक्य झाले. या कार्यात वाहक, चालकांचे योगदान मोठे आहे.


















