- इंद्रायणी महाविद्यालयात ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमालेस सुरुवात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १९ डिसें.) :- यशवंतराव चव्हाण यांनी सर्व क्षेत्रांत केलेल्या कार्याची महती गात असताना यशवंतरावांविषयक आठवणींनी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना अश्रू अनावर झाले. तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित चौथ्या मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘यशवंतराव चव्हाण एक अलौकिक व्यक्तिमत्व’ या विषयावरील व्याख्यानात पाटील बोलत होते. यावेळी पाटील यांनी यशवंतरावांचे प्रसंगावधान, कल्पकता, दूरदृष्टी व धोरणी स्वभाव असे अनेक पदर उलगडले.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, चार्टर्ड अकाऊंटंट वर्धमान जैन, उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, विश्वस्त मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. बी.बी. जैन, निरुपा कानिटकर आदी उपस्थित होते.
यावेळी यशवंतरावांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जीवनपटच पाटील यांनी उलगडला. यशवंतराव हे बहुजनांचे राज्य होण्यासाठी प्रयत्न करणारे नेते होते. शरद पवार आणि मी यशवंतरावांचे शिष्य आहोत. यशवंतराव चव्हाण यांनी शालेय शिक्षणात दिलेल्या फी सवलतीमुळे आज मुली शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत. धर्मांतर केल्यानंतरही ही फी सवलत कायम राहावी, अशी तरतूद यशवंतराव यांनी करून ठेवली आहे. एकंदरीत शिक्षणामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे स्वरुप यशवंतरावांमुळे बदलले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात यशवंतरावांनी भरीव कार्य करून ठेवले आहे. १९६० मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुढील अडीच वर्षात महाराष्ट्राची जी घडी बसविली आहे, ती अद्याप उलगडलेली नाही. इतका दूरदृष्टिकोण यशवंतराव यांच्याकडे होता, असेही पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी पंडित नेहरू यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन भारताच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. पुढे त्यांना भारताच्या गृहमंत्री पदाची धुरा इंदिरा गांधी यांच्या आग्रहावरून स्वीकारावी लागली. सिक्किमच्या जनतेने १४ एप्रिल १९७५ रोजी सिक्किममध्ये झालेल्या सार्वमताच्या आधारावर सिक्किमला भारतामध्ये सामील करून घेण्याची विनंती तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना केली. ती विनंती ठरावाच्या स्वरुपात गृहमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी २६ एप्रिल १९७५ रोजी लोकसभेच्या पटलावर मांडली. तो ठराव दोन तृतियांश बहुमताने पारित केला आणि त्याचमुळे सिक्किमचा समावेश भारतीय प्रजासत्ताकातील २२ वे राज्य म्हणून ३६ व्या राज्यघटना दुरुस्तीनंतर १६ मे १९७५ पासून झाला. त्यामुळे सिक्किम राज्यात राजेशाही संपून लोकशाही राज्यनिर्मिती झाली आणि राज्यपाल पदाची सुरुवात झाली.
स्व. यशवंतरावांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मभूमी-कर्मभूमीतला मी सिक्किम राज्याचा पंधरावा राज्यपाल म्हणून धुरा सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने लाभलेल्या शिकवणुकीचे आजपर्यंत पालन करीत आलो आहे, असेही त्यांनी सांगितले. वेणूताई आजारी असताना त्यांनी यशवंतरावांच्या मांडीवर डोके ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यशवंतरावांच्या मांडीवर डोके ठेवताच त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रसंग सांगताना पाटील यांना अश्रू आवरता आले नाहीत. भावनाविवश झालेल्या पाटील यांच्या डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या ते त्यांनाही कळले नाही.
प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले आणि प्रा. काशिनाथ अडसूळ यांनी, तर शैलेश शहा यांनी आभार मानले.