न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २१ डिसें.) :- जीवनात आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे प्रथम निश्चित केले पाहिजे. कोणतेही काम आपले काम म्हणून करा. जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन बीव्हीजी सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘उद्योगातील संधी’ या विषयावरील व्याख्यानात गायकवाड बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, राजेश मस्के, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, निरुपा कानिटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, क्रीडा स्पर्धात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
गायकवाड म्हणाले, की पुढील बारा वर्षांत 10 कोटी लोकांचा जीवनमान बदलविण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवत आहोत. कर्करोगासह अन्य विविध आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विषमुक्त शेती करताना, उत्पादकता वाढविण्याचे धेय्य ठेवले आहे. त्यासाठी अल्पदरात माती परीक्षण व पाणी परीक्षण करून दिले जात आहे.
गायकवाड यांनी यशस्वी व्यवसायासाठीच्या टिप्स्ही विद्यार्थ्यांना दिल्या. कुठलेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास बाळगावा. दर्ज्यात सातत्ये ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या युगात अपेक्षित बदल आत्मसात करावेत, असेही त्यांनी नमुद केले. सोबतच बीव्हीजीच्या आगामी काळात येऊ घातलेल्या विविध संकल्पनांविषयीची माहिती त्यांनी दिली. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कधीही मानसिक ताणतणाव घेऊ नका, असे नमूद करून शिक्षण, संस्कार व आरोग्य या त्रिसूत्रीचा अवलंब करून अष्टपैंलू व्यक्तिमत्त्व घडविण्याचा विद्यार्थ्यांने प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा. वनमाला डोईफोडे यांनी, तर आभार गणेश भेगडे यांनी मानले.