- राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ‘महिला दिन’ साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च २०२१) :- समाजातील काही स्त्रियांवर पुरूषवादी विचारांचा पगडा कायम राहिला आहे. कुटुंबातील सासू, नणंद यांच्याकडून सुनेचा छळ होतो. सुनेला घरातीलच स्त्रियांकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यामुळे हुंडाबळी, अत्याचार, शारीरिक आणि मानसिक पिळवणुकीला स्त्रियांना तोंड द्यावे लागते. यातून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांनी स्वावलंबी बनले पाहिजे. उद्योग, व्यवयास, नोकरी या क्षेत्रांमध्ये पुढाकार घेऊन जोपर्यंत आर्थिक सत्ता निर्माण करत नाहीत. तोपर्यंत महिलांचे स्थान उंचावणार नाही, असा विश्वास पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माजी आमदार विलास लांडे, प्रमुख पाहुणे तहसीलदार गीता गायकवाड, पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर यांच्यासह नगरसेवक विक्रांत लांडे, युवा कार्यकर्ते विराज लांडे, प्राचार्य गौतम भोंग, व्याख्याते गणेश शिंदे, लेखिका पौर्णिमा कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते. माजी आमदार लांडे यांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला. नगरसेवक विक्रांत लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त (सोमवार, दि. 8) आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सहप्राध्यापिका डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी लिहिलेल्या ह. मो. मराठे यांच्या कथांमधील पुरूषचित्रण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्य सरकारच्या कोविड १९ प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की, कौटुंबिक कलहातून महिलांच्या विरोधात कटकारस्तान रचले जाते. पीडित महिलेला न्यायालयाच्या कटग-यात उभे राहून न्यायाधिशांसमोर याचना करावी लागते. खरे प्रकरण घडल्याचे विश्लेशन करावे लागते. आज महिलांना सुध्दा मुलाचीच अपेक्षा असते. मुलगी जन्माना आल्याचे दुःख व्यक्त केले जाते. कित्येक मुलींना गर्भातच नष्ट केले जाते. ही पुरूषी मानसिकता संपविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊन त्यांना घडविणा-या राजमाता जिजाऊंचे विचार महिलांनी डोक्यात रुजविले पाहिजेत.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देऊन त्यांना घडविण्याचे कार्य ज्या मातोश्रीने केले. त्या राजमाता जिजाऊंचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. म्हणून त्यांच्या नावाने संस्था स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात मार्ग निवडला. संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा स्टाफ असून शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिका आहे. शैक्षणिक क्षेत्रात महिलांना सक्षम कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करून महाविद्यालयाच्या माध्यमातून स्त्रियांना दिशा देण्याचे काम करत आलो आहे. त्यासाठी संपूर्ण स्टाफ, कर्मचा-यांचे मोठे योगदान आहे. तसेच, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मुलीचे नाव शौर्या आहे. जे शौर्य कृष्णप्रकाश यांच्या अंगी आहे, ते मुलीच्या माध्यमातून समाजापुढे येण्यासाठी त्यांची धडपड आहे. आयुक्तांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगरसेवक विक्रांत लांडे म्हणाले, समाजात महिलांच्या मनावर दडपणाचं ओझं असतं. परंतु, वेगवेगळ्या क्षेत्रात महिलाच आघाडीवर आहेत. जातीवाद, धर्मवाद, स्त्री-पुरूष भेदभाव नाहीसा झाला पाहिजे. एकेविसाव्या शतकात ७३ टक्के महिला प्रवाहाच्या बाहेर आहेत. देशाच्या प्रगतीसाठी ही बाब अत्यंत खेदजनक मानली जाते. हे प्रमाण ५० टक्के कसं करता येईल, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी नेल्सन मंडेला यांचे उदाहरण देऊन विरोधकांचा सन्मान कसा केला जातो, हे स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य गौतम भोंग यांनी केले. आभार डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी मानले.
















