- कुदळवाडी-चिखलीतील विज समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- कुदळवाडी, चिखली भागातील विज समस्यांच्या अडचणींबाबत मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरण प्रादेशिक संचालक यांना सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणी केली. नागरिकांनी यावेळी त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला आणि समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश यादव यांच्यामुळे पुढील काळात या भागातील विज समस्यांचे निदान निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
महावितरण कंपनीने कुदळवाडी,चिखली भागात नव्याने विज रोहित्रांची उभारणी करावी,आहे त्या रोहित्रांची क्षमता वाढवावी,जमिनीवरील तारा हटवून भूमिगत वाहिन्यांची नव्याने उभारणी करावी आदी मागण्यांचे निवेदन दिनेश यादव यांनी प्रादेशिक संचालक यांची भेट घेत दिले होते.त्यानुसार गुरुवार(ता.११)रोजी स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांना या भागातील समस्या अवगत करून द्यायला यादव यांच्या पुढाकाराने पाहणी करण्यात आली.अनेक भागातील उद्योजक,नागरिक यांच्या भेटी यादरम्यान घेऊन त्यांना ज्या अडचणी आहेत त्याबाबत अधिकाऱ्यांना अवगत करून देण्यात आले.अनेक ठिकाणी व्होल्टेज कमी असणे,विज पुरवठा सुरळीत नसणे,वारंवार विज पुरवठा खंडित होणे आदी समस्या ज्या भागात जास्त आहेत,त्या भागाला भेट देऊन पुढील नियोजन आखण्यात आले.
रहिवासी भागातील नागरिकांच्या घराजवळील विज वाहिन्या हटविणे,फिडर बॉक्स ची दुरुस्ती आदी कामांची यावेळी पाहणी करण्यात आली आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले.मिळालेल्या माहितीनुसार नव्याने सुमारे १५ ते २० रोहित्रे उभारणे,सध्या असलेल्या सुमारे २५ ते ३० विज रोहित्रांची क्षमता वाढविणे,३० ते ४० ठिकाणी जमिनीवरील धोकादायक तारा हटवून भूमिगत वाहिनी टाकणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या अनेक वर्षात या भागातील वाहिन्यांचे मेन्टेनंस करण्यात आलेले नसल्याने समस्या जटिल बनलेल्या आहेत.
पुढील काही महिन्यात आमदार श्री महेश लांडगे यांच्या पुढाकाराने या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने निश्चितपणे कारवाई होणार असल्याचा विश्वास दिनेश यादव यांनी यावेळी बोलवून दाखविला.तसेच कुदळवाडी,चिखली भागातील महावितरण पायाभूत सुविधा विकसन होण्याच्या दृष्टीने सुनियोजितपणे पावले उचलून पुढील २० वर्षे या भागातील नागरिकांना समस्या राहणार नाहीत आणि दर्जेदार सेवा मिळेल असे काम करण्याचा मानस दिनेश यादव यांनी बोलून दाखविला आहे.