- मालकाचे दुर्लक्ष; नातेवाईकांच्या आरोपावरून कंपनीचा मालक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :-उरवडे-पिरंगुट औद्योगिक वसाहमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीस सोमवारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या आरोपावरून कंपनीचा मालक निकुंज शहा यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
तेथे उपस्थित असलेल्या काहींनी सांगितले की, या कंपनीत आठ दिवसांपूर्वीच एक छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हाच काळजी घेण्याची गरज होती. जर तेव्हाच काळजी घेतली गेली असती, तर आज अशी दुर्घटना घडली नसती. आमची माणसं नाहक गेली नसती. तसेच, कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली होती.
दरम्यान, आगीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.