- १० वी परिक्षेचा २० जुलैला तर १२ वीचा ३१ जुलैला निकाल जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा CBSE बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सींग अशा अडचणींच्या फेऱ्यात अडकलेला CBSE बोर्डाचा इयत्ता दहावी, बारावी परिक्षांचा निकाल कधी लागणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. विविध माध्यमांतून विविध तारखा आणि अफवा पसरवल्या जात होत्या. कधी ही तारीख तर कधी ती तारीख. याबाबत आता बोर्डाकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यामुळे निकालाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
CBSE बोर्डाने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०: ३०: ३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार आहे. यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.