- १९ जुलैला एसटी बसमधून पंढरपूरला होणार रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा आज (गुरूवार) पार पडत असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात विसावणार आहेत. त्यानंतर १९ जुलै रोजी एसटी बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
देहू नगरी दरवर्षी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून जाते. मात्र, गेल्यावर्षीपासून करोना महमारीचं संकट निर्माण झालेलं असल्याने, अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले.
देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन विश्वास्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, संपूर्ण देहूनगरीत आज शांतमय वातावरण आहे. दरम्यान, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून १९ जुलै रोजी एसटीमधून पंढरपूरला रवाना होणार आहे.